काँग्रेसकडून भाजप सरकारचा निषेध
By Admin | Updated: November 2, 2015 00:24 IST2015-11-01T22:28:36+5:302015-11-02T00:24:54+5:30
सरकारच्या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा

काँग्रेसकडून भाजप सरकारचा निषेध
मालवण : भाजप सरकारने एक वर्षाच्या कालावधीत जनतेची केवळ फसवणूक करताना दिशाहीन काम केले आहे. सरकारने जनतेच्या केलेल्या या घोर फसवणुकीचा काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करत भाजप सरकारने अशाच प्रकारची कार्यपद्धती सुरू ठेवून जनतेची फसवणूक केली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा मालवण तालुका काँग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार जी. के. सावंत यांच्याकडे देवून जिल्ह्यातील अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने शनिवारी नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, युवक काँग्रेसचे बाबा परब, अनिल कांदळकर, उदय परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, आबा हडकर, पपन मेथर, राजू बिडये, विजय निकम, संजय लुडबे, दादा नाईक, सुभाष लाड, तमास फर्नांडिस, बिजेंद्र्र गावडे, प्रदीप मांजरेकर आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
आघाडी सरकारने सी-वर्ल्ड प्रकल्प वायंगणी-तोंडवळी येथे आणला होता. मात्र, भाजपप्रणीत सरकारने प्रकल्पाचे कामकाज बंद केले आहे. तसेच बहुचर्चित चिपी विमानतळाची धावपट्टी कमी करत दर्जाहीन काम सुरु आहे.
जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना अल्प प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली आहे. पारंपरिक मच्छिमारांवर होणाऱ्या अन्यायाकडे सरकार डोळेझाक करत आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजना बंद केल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भाजपप्रणीत सरकारने जीवनावश्यक सर्व वस्तूंचे भाव वाढवले असल्याने गोरगरीब जनतेला जगणे मुश्किल बनले आहे. धान्य दुकानांवर धान्याची अनुपलब्धता असून स्वस्त दाराची धान्य दुकाने सरकार मोडीत काढण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्यात आत्महत्या आणि भूकबळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
तर सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना चालू वर्षात अकरावी व पदवीधर शिक्षणसाठी प्रवेशही मिळाला नाही.
गेल्या वर्षभरात भाजप सरकारने केवळ घोषणाबाजी करत जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मालवण तालुका काँग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)