शौचालय घोटाळ्यावरून सेना आक्रमक
By Admin | Updated: November 2, 2015 23:57 IST2015-11-02T22:48:54+5:302015-11-02T23:57:57+5:30
अधिकाऱ्यावर फ ौजदारीची मागणी : अभ्यास केल्याशिवाय चर्चा न करण्याची सभापतींकडून सूचना

शौचालय घोटाळ्यावरून सेना आक्रमक
सावंतवाडी: इंदिरा आवासमधील घरांना शासनाने शौचालय दिले असताना पुन्हा त्याच कुटुंबाना शौचालयासाठी १२ हजार रूपये कशासाठी दिले? असा सवाल शिवसेना गटनेते अशोक दळवी यांनी पंचायत समिती बैठकीत केला. तसेच या योजनेत ९ लाखाचा भ्रष्टाचार झाला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी करीत सभागृहात चर्चेची मागणी केली. मात्र, सभापती प्रमोद सावंत यांनी कोणत्याही विषयाचा अभ्यास केल्याशिवाय चर्चा करू नका, असे मत व्यक्त केले. पण चर्चा शिवसेनेने नाकारल्याने सदस्यांनी आक्रमक होत सभात्यागाचा इशारा दिला.
सावंतवाडी पंचायत समितीची बैठक सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी गटविकास अधिकारी मोहन भोई, एकात्मिक विकास अधिकारी मिलिंद जाधव, बांधकामचे उपअभियंता राजन पाटील, पशुसंवर्धन अधिकारी एस. आर. देशमुख आदींसह सदस्य अशोक दळवी, श्वेता कोरगावकर, लाडोबा केरकर, राघोजी सावंत, प्रियंका गावडे, रोहिणी गावडे, गौरी आरोंदेकर आदी यावेळी उपस्थित होते.
आंबोली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत पंचायत समिती सदस्या रोहिणी गावडे यांनी सवाल उपस्थित केला. त्यावर वैद्यकीय अधिकारी यांनी अद्याप चौकशी अहवाल पूर्ण झाला नाही. जिल्हा वैद्यकीय अधिकारी याची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. तर सभापती प्रमोद सावंत यांनी हा अहवाल पुढच्या बैठकीत सभागृहासमोर ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले. जिल्हा परिषद बांधकाम तसेच शिक्षण विभागावरून काही प्रश्न अशोक दळवी तसेच रोहिणी गावडे यांनी उपस्थित केले.
तर पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी वेर्ले येथे १७ कुटुंबाना इंदिरा आवासमधून घरे देण्यात आली त्यांना त्यावेळी शौचालयही देण्यात आले. मग नंतर पुन्हा कोणत्या आधारे शौचालयासाठी पैसे दिले गेले, असा सवाल उपस्थित केला? यावर सभापती प्रमोद सावंत यांनी विषयाची माहिती नाही. माहिती घेतो व नंतर चर्चा घडवून आणू, असे उत्तर दिले. मात्र, त्यावर सदस्य अशोक दळवी यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सभापती सावंत यांना शौचालयाच्या विषयावरून धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात ९ लाखाचा घोटाळा झाला आहे. अनेक ठिकाणी शासनाचे दोन निधी एकाच घरात खर्च घातले गेले आहेत. हे योग्य नाही. कोणाच्या आशीर्वार्दाने हे चालले आहे, शौचालये देण्यात आली त्याची कागदपत्रे योग्य नाहीत. आवक- जावक रजिस्टर ठेवण्यात आले नाही. मग हा भ्रष्टाचार म्हणायचा की काय म्हणायचे, असा सवाल करीत या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी दळवी यांनी केली. मात्र, सभापती सावंत यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली. आम्ही याचा अभ्यास करू तसेच शासनाचे वेगवेगळे अध्यादेश आले त्याची माहिती घ्या, मग सभागृहात बोला, असा सल्ला दिला. पण दळवी यांनी सावंत यांचा सल्ला फेटाळून लावत तुम्ही चर्चा घडवून आणा, अन्यथा तशी नोंद घ्या. आमच्या हक्कावर गदा आणू नका. हा घोटाळा मोठा आहे. दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल झाली पाहिजे, अशी मागणी दळवी यांनी लावून धरत सभात्याग करण्याचा इशारा दिला. मात्र, सावंत आपल्या मागणीवर ठाम राहत यावर चर्चा घडवून आणण्यात आली नाही.
या बैठकीत विद्युत विभागावर चर्चा झाली. बिले एक दिवस उशिरा आल्याबाबत अभियंता नितीन पाटील यांना जाब विचारला.
यावेळी त्यांनी उशिरा बिल आले असेल तर त्याचे शुल्क आकारले जाणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी कृषिविभाग, लघू पाटबंधारे, ग्रामपंचायत आदी विषयावर चर्चा झाली. (प्रतिनिधी)
गट स्थापन : पंचायत समिती सभेकडे पाठ
सावंतवाडी पंचायत समितीत वेगळा गट स्थापन करणाऱ्या चार सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र केल्यानंतर त्यांनी पंचायत समितीच्या आजच्या सभेकडे पाठ फिरवली. यात उपसभापती महेश सारंग, सदस्य नारायण राणे, सुनयना कासकर, विनायक दळवी आदींचा समावेश होता.