प्रत्येक शाळेत ‘चावडी वाचन’ राबवा
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T23:28:41+5:302015-07-25T01:13:31+5:30
शेखर सिंह : प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्य सादर करण्याची संधी

प्रत्येक शाळेत ‘चावडी वाचन’ राबवा
सिंधुदुर्गनगरी : केंद्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १५ आॅगस्ट, २ आॅक्टोबर व ३ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक प्राथमिक शाळेत चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे कौशल्य सादर करण्याची संधी मिळावी, अध्ययन व अध्यापनाचे मूल्यमापन करून त्यामध्ये सुधारणा करता यावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांनी चावडी वाचन कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारच्या पत्रकार परिषदेत केले.
चावडी वाचन कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, सर्व शिक्षा अभियानचे कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे, जिल्हा माहिती सहाय्यक अर्चना माने आदी उपस्थित होते.
केंद्रशासनाच्या निर्देशानुसार सन २०१३-१४ पासून संपूर्ण राज्यभरात चावडी वाचन कार्यक्रम राबविला जातो. चालू शैक्षणिक वर्षातही कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये काही बदल सुचविले आहेत. यापूर्वी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला सहभागी करून घेऊन हा चावडी वाचन कार्यक्रम शाळांमध्ये आयोजित करण्यात येत होता.
मात्र, आता त्याचा विस्तार करत त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पंचायत समिती स्तरावरील सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ, युवक, समाजसेवक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक यांचा सहभाग राहणार आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. तर चावडी वाचन कार्यक्रमापूर्वी किमान तीन दिवस अगोदर सर्व संबंधितांना कळविण्यात येणार आहे, अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली.
यामुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांची प्रगती करून घेता येईल. शिक्षणाचा दर्जाबाबतही मूल्यमापन होईल. प्रत्येक शिक्षकाला आपण काय शिकवितो, त्याचे विद्यार्थ्यांना आकलन होते का? कोणत्या विद्यार्थ्याकडे जादा लक्ष देणे आवश्यक आहे याचेही मूल्यमापन करता येईल. त्यामुळे चावडी वाचन हा उपक्रम अतिशय चांगला आहे. (प्रतिनिधी)
चावडी वाचनासाठी तीन दिवसांची निश्चिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे चावडी वाचन कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शासन निर्देशानुसार १५ आॅगस्ट, २ आॅक्टोबर व ३ जानेवारी या दिवशी चावडी वाचन कार्यक्रम दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक
शाळेत आयोजन केले जाईलच. त्या व्यतिरिक्त प्रत्येक शाळेने
महिन्यातून एकदा शाळा व्यवस्थापन समिती व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या
आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मूल्यमापन
चावडी वाचन कार्यक्रमावेळी जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी अचानक भेट देत या कार्यक्रमाचे मूल्यमापन करणार आहेत. चावडी वाचन कार्यक्रम सहज, आनंददायी, अनौपचारीक वातावरणात घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यावर चावडी वाचन कार्यक्रमाचे दडपण येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात चावडी वाचन कार्यक्रम प्रभावीपणे राबवून शैक्षणिक दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली.