शरीराचे ‘चिपाड’ झाल्यावर ना सणाचे भान राहते, ना परिस्थिती

By Admin | Updated: November 2, 2015 22:30 IST2015-11-02T22:24:06+5:302015-11-02T22:30:04+5:30

असेही दुष्टचक्र : ऊसतोड, कर्ज फेडण्यातच सरते आयुष्य; सणाला गोडधोड नव्हे, भाजी-भाकरीचीही असते पंचाईत

After the body 'chipad', there is no fear of festivity, nor the situation | शरीराचे ‘चिपाड’ झाल्यावर ना सणाचे भान राहते, ना परिस्थिती

शरीराचे ‘चिपाड’ झाल्यावर ना सणाचे भान राहते, ना परिस्थिती

 नाशिक :गेल्या वर्षी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पाच-सात महिने ऊसतोड करीत राबायचे, त्यातून जुने कर्ज फिटल्यावर पुन्हा नवे कर्ज घेऊन गावाकडे जायचे... त्यावर गुजराण करीत पुढच्या वर्षी पुन्हा ऊसतोडीसाठी हजर व्हायचे... हेच दुष्टचक्र ‘त्यांच्या’ आयुष्यात अव्याहत सुरू राहते... कर्ज फेडता-फेडता आणि ऊसतोड करता-करता त्यांच्या शरीराचेच पार ‘चिपाड’ होऊन जाते... मग अशात सण साजरा करण्याचे भान राहत नाही आणि परिस्थितीही...
दसऱ्यानंतर मुकादमाच्या बैलगाडीत बसून उसाच्या शेतीची वाट धरणाऱ्या आणि सकाळी सातपासून सायंकाळपर्यंत कंबरेत वाकून ऊस तोडणाऱ्या कामगारांची ही व्यथा आहे. मालेगाव, सटाणा ते थेट धुळे जिल्ह्यातून हे शेकडो आदिवासी मजूर दरवर्षी दसऱ्यानंतर निफाड, सायखेडा, चांदोरी, चापडगाव या परिसरात बायका-पोरांसह ऊसतोडीसाठी दाखल होतात. त्यांच्या ‘टोळ्या’ येण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. घराला कुलूप लावून, फाटका संसार ट्रकमध्ये घालून आणणारी ही माणसे ऊसतोडीच्या भागातल्या मोकळ्या जागेत झोपड्या उभारून राहतात. पहाटे चारला उठून स्वयंपाक केला जातो. भल्या सकाळीच भाजी-भाकरी खाऊन सात वाजता ते कामावर हजर होतात. साधारणत: तिघा जणांची एक ‘टोळी’ असते. त्यात नवरा-बायको आणि एखाद्या मुलाचा समावेश असतो. दोघांनी कोयत्याने ऊस तोडायचा आणि बाईमाणसाने त्याची मोळी बांधायची. बैलगाडीभर ऊस तोडून झाला की, दोघा माणसांनी गाडी भरायला सुरुवात करायची आणि त्या वेळेत बाईने ऊस तोडायचा. अशी एक टोळी दिवसभरात साधारणत: तीन बैलगाड्या (तीन टन) ऊस तोडते. एक टन ऊस तोडल्यास २६० रुपये मिळतात. असा इतर टोळ्यांनी तोडलेला ऊस मिळून रोज सतरा-अठरा टनांचा ट्रक भरतो. सायंकाळी पाच वाजता काम थांबल्यावर पुरुषांनी जनावरांच्या खाण्यासाठी उपयोगात येणारी ‘बांडी’ जवळच्या गावात नेऊन विकायची. त्या पैशांतून मीठ-मिरची आणायची आणि महिलांनी संध्याकाळचा स्वयंपाक शिजवायचा. पुढचे पाच-सात महिने- म्हणजे ‘आखाजी’पर्यंत (अक्षय्यतृतीया) हेच चक्र चालू राहते.
मोसम संपला की, सर्वांचा हिशेब केला जातो. साखर कारखान्यांनी नेमलेल्या मुकादमांकडून या कामगारांनी आधीच पन्नास-साठ हजार रुपये कर्ज उचललेले असते. त्यापैकी यंदाच्या कामातून किती फिटलेत, हे पाहिले जाते. मुकादमाकडून पुन्हा नवी उचल दिली जाते. ही उचल आणि जुने कर्ज फेडण्यासाठी मजूर पुढच्या वर्षी पुन्हा कामावर हजर होतो.
मुळात हे सगळे कामगार निरक्षर असल्याने त्यांना हिशेब समजत नाही. त्यांनी उचललेल्या कर्जावर व्याज लावले जाते. एवढेच नव्हे, त्यांना उसाच्या वाहतुकीसाठी पुरवल्या जाणाऱ्या बैलगाड्यांचे भाडेही (मोसमाला सात हजार) त्यांच्याकडूनच वसूल केले जाते. मूळ कर्ज, त्यात नवी भर, बैलगाडीचे भाडे आणि या सगळ्यांवरचे व्याज अशी रक्कम फुगतच जाते आणि यांचे कर्ज कधीच फिटत नाही.
आयुष्य असे कर्जातच अखंड बुडून राहत असताना, दिवाळी कसली साजरी करणार? या मजुरांना ऐन दिवाळीतही सुटी नसते. रोजच्या खाण्याचेच वांधे असल्याने फटाके, नव्या कपड्यांचा प्रश्नच उद्भवत नाही. गोडधोड करण्याची ऐपत नसते. दिवाळीसाठी मुकादम त्यांना खर्चासाठी म्हणून दोनशे रुपये देतो खरे; पण तेही पुन्हा हिशेबातून कापून घेतले जातात.
सतत कंबरेत वाकून ऊसतोड केल्याने या कामगारांना पाठीचे, कंबरेचे आजार जडतात. मोसमाच्या सुरुवातीला शरीराला सवय नसल्याने ही माणसे आजारी पडतात. अशा वेळी त्यांना दवाखान्यात नेले जाते; पण त्याचा खर्चही हिशेबातून वजा केला जात असल्याने आजारी पडणेही त्यांना परवडणारे नसते.
आई-बाप ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाल्याने मुलांची शाळा पूर्ण होत नाही. मग दहा-बारा वर्षांची झाल्यावर मुलेही हातात कोयता, नंतर शिरावर बापाच्या कर्जाची जबाबदारी घेतात आणि हळूहळू ऊसतोड कामगारांची नवी पिढी घडत जाते... एवढ्या सगळ्या उपद्व्यापातून दोनच गोष्टी होतात- एक तर त्या कामगाराच्या कुटुंबाचे पोट भरते आणि दुसरे म्हणजे, गेल्या वर्षीचे कर्ज फेडल्याचे समाधान लाभते!
- त्वचेला भेगा पाडणाऱ्या थंडीत आणि शरीराला होरपळून काढणाऱ्या उन्हात ही माणसे फक्त जुने कर्ज फेडण्यासाठी पिढ्यान्पिढ्या राबत असतात. त्यांचे हे राबणे समाजाच्या चांगुलपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत असते...

Web Title: After the body 'chipad', there is no fear of festivity, nor the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.