जिल्ह्यात शांततेत ७२ टक्के मतदान
By Admin | Updated: April 23, 2015 00:35 IST2015-04-22T23:04:03+5:302015-04-23T00:35:07+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : सोनाळीत बाचाबाचीचा किरकोळ प्रकार, आचिर्णेत कार्यकर्त्याला धमकी

जिल्ह्यात शांततेत ७२ टक्के मतदान
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत असून २१२ मतदान केंद्रांवर बुधवारी झालेल्या निवडणुकीत किरकोळ प्रकार वगळता शांततेत ७२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एकूण ९४४ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले. २३ एप्रिल रोजी सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हाती येतील. त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व राहिल, हे स्पष्ट होईल.सकाळी ११.३0 वाजेपर्यंत धीम्या गतीने अवघे ३८ टक्के मतदान झाले. दुपारी ३.३0 पर्यंत मात्र वेग वाढल्याने ५९ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. त्यानंतर सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत मतदानाची वेळ संपली तेव्हा ७२ टक्के मतदान झाले. एकूण ५८ हजार ११४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची नोंद झाली आहे. वैभववाडीत ६९ टक्के मतदानवैभववाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या ५८ जागांसाठी १२२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. तालुक्यात सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून गुरुवारी सकाळी १० वाजता तहसीलमध्ये मतमोजणी सुरु होणार आहे. तालुक्यात सर्वाधिक मतदान एडगावमध्ये ८१ टक्के तर सर्वात कमी कुंभवडेत ५५ टक्के इतके झाले. १० हजार ९६० मतदारांपैकी ७ हजार ५६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३ हजार ५८७ (६१ टक्के) महिला तर ३ हजार ९८१ (७७ टक्के) पुरुषांचा समावेश आहे. यावेळी महिलांपेक्षा मतदान केलेल्या पुरुषांची संख्या अधिक आहे.ग्रामपंचायतनिहाय झालेले सरासरी मतदान पुढीलप्रमाणे - लोरे ७२ टक्के, सोनाळी ७३ टक्के, मांगवली ७१ टक्के, कोकिसरे ६३ टक्के, खांबाळे ६६ टक्के, एडगाव ८१ टक्के, वेंगसर ७२ टक्के, सांगुळवाडी ७९ टक्के, आचिर्णे ७८ टक्के, भुईबावडा ५७ टक्के व कुंभवडेत ५५ टक्के मतदान झाले. अटीतटीची लढत असलेल्या सोनाळी, आचिर्णे, मांगवली, लोरे, एडगाव, वेंगसर, सांगुळवाडी या गावात चुरशीने ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.
देवगड तालुक्यात ७१.८0
देवगड तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे ७१.८० टक्के मतदान झाले. या निवडणुकीत १२४ जागांसाठी २७७ उमेदवारांचे •भवितव्य बुधवारी मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गुरूवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होत असून मतमोजणीसाठी ९ टेबलांची मांडणी केली आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
मिठबांव ६६.८१, पुरळ ७१.८०, रहाटेश्वर ६२.११, धालवली ६९.१९, पाटथर ७६.७०, पाळेकरवाडी ७६.२६, टेंबवली ५८.४९, कुणकेश्वर ८२.३६, तांबळडेग ६१.५, तळवडे ६३.८०, नाडण ७७.३७, शिरगाव ६८.७९, मुणगे ६०, इळये ७९.९१, कातवण ७८.७८, मोंड ६६.७८, मुटाट ६९.३७, गढीताम्हाणे ७३.१, वाडा ६२.३४, मोंडपार ८६, लिंगडाळ ८२.२६ व दोन पोटनिवडणुकीमध्ये वाघिवरे- वेळगिवे ६३.३१ व खुडी येथे ७४ टक्के मतदान झाले.
सावंतवाडीत ६६ टक्के
सावंतवाडी तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या. तालुक्यात एकूण सुमारे ६६ टक्के मतदान झाले. त्यामुळे तालुक्यातील २३४ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १३ ग्रामपंचातींसाठी २३४ उमेदवार रिंगणात होते.
दोडामार्ग ७८ टक्के
तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक व दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका आज बुधवारी पार पडल्या. तालुक्याचे मतदान ७८ टक्के झाले. ४७ उमेदवारांचे भवितव्य मतदार पेट्यांमध्ये सीलबंद झाले. कोणताही अनुचित प्रकार प्रकार न घडता निवडणूक शांततेत पार पडली.
कणकवलीत सरासरी ७१ टक्के
तालुक्यातील गांधीनगर, भिरवंडे, तोंडवली- बावशी या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर तळेरे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी शांततेत सरासरी ७१ टक्के मतदान झाले.
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १४ जागांसाठी झालेल्या मतदानात २९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
मालवणात ५७ टक्के
तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या मसुरे ग्रामपंचायतीसह ७ ग्रामपंचायतींच्या ५४ जागांसाठी बुधवारी शांततेत व मोठ्या उत्साहात मतदान झाले. तालुक्यात सरासरी ५७ टक्के मतदानाची नोंद झाली.
या मतदान प्रक्रियेत १२७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणेने चोख कामगिरी बजावली. २३ एप्रिल रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूल येथे सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे.
कुडाळात ७० टक्के
कुडाळ तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींसाठी ७०.३३ टक्के मतदान झाले आहे. एकूण १०,८४५ मतदारांपैकी ७ हजार ६२७ मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण १३० उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीत बंद केले. कुडाळ तालुक्यातील वसोली ग्रामपंचायतीत ६२.३४ टक्के मतदान झाले तर वाडोस - ७६.४१ टक्के, गोठोस - ७६.६१ टक्के , गिरगाव कुसगाव- ६९ टक्के, कुपवडे - ७० टक्के, आकेरी - ७८ टक्के, माड्याचीवाडी- ६५ टक्के, गोवेरी - ७१ टक्के व पोखरण कुसबे ग्रामपंचायतीत ५७ टक्के मतदान झाले.
आरवलीत ६८, सागरतीर्थमध्ये ७६
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथे ६८ टक्के, तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीमध्ये ७६ टक्के मतदान झाले. आरवली मतदारसंघातून १,९१२ पैकी १,३११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सागरतीर्थ मतदार संघात एकूण ७६ टक्के मतदान झाले. १,६३८ मतदारांतून १,२९५ मतदारांनी मतदान हक्क बजावला. आरवलीमध्ये पी. एस. सावंत, तर सागरतीर्थमध्ये सी. जे. बागायतदार यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. (ठिकठिकाणचे प्रतिनिधी)