५९७ साकव डळमळीत
By Admin | Updated: November 28, 2014 00:07 IST2014-11-27T22:50:31+5:302014-11-28T00:07:13+5:30
जिल्हा नियोजन : दुरुस्तीसाठी कसलीच तरतूद नाही

५९७ साकव डळमळीत
रहिम दलाल - रत्नागिरी --जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५९७ साकव मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत आहेत. या साकवांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनकडे निधीची तरतूदच नसल्याने ते दुरुस्त कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावरुन ग्रामस्थांची ये-जा करण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या साकवांची स्थिती दयनीय झाली असून, ते मोडकळीस आले आहेत. हे साकव मोडकळीस आल्याने त्यावरुन जीव हातात घेऊन ग्रामस्थ ये-जा करतात.
वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोडकळीला आलेल्या साकवांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडून मागविले होते. जिल्हाभरातून ५९७ साकवांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीसाठी आले होते.
या साकवांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ७८ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तयार करुन तो जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केला होता. मात्र, जिल्हा नियोजन विभागाकडे साकवांच्या दुरुस्तीसाठी तरतूद नसल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे एप्रिल, २०१३ मध्ये जिल्हा परिषदेने साकव दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता. दीड वर्ष उलटले तरी हा दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धूळखात पडून आहे. जिल्हा नियोजन विभागाकडून साकव दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला. जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार या दुरुस्तीबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याला अजिबात प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्ह्यातील साकव दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा परिषदेने शासनाच्या जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे आता तरी या साकवांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
साकव दुरुस्तीच्या निधीसाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे. मात्र, साकव दुरुस्तीसाठी निधीची तरतूद नसल्याचे त्यांनी कळविले असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
तालुकानादुरुस्त
साकव
मंडणगड २२
दापोली४३
खेड८३
चिपळूण९०
गुहागर४९
संगमेश्वर६०
रत्नागिरी४३
लांजा१०६
राजापूर७१
एकूण साकव ५९७