३६ ग्रामपंचायती लोकराज्य ग्राम
By Admin | Updated: September 29, 2015 23:56 IST2015-09-29T23:32:34+5:302015-09-29T23:56:38+5:30
धनादेश सुपूर्द : कणकवली तालुक्याचा राज्यातील उच्चांक

३६ ग्रामपंचायती लोकराज्य ग्राम
कणकवली : तालुक्यातील ६३ पैकी ३६ ग्रामपंचायती एकाचवेळी लोकराज्य ग्राम झाल्या आहेत. शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘लोकराज्य’ या मासिकाचे गावातील कुटुंबागणिक वार्षिक वर्गणीदार केले असून, राज्यातील हा उच्चांक आहे. मंगळवारी येथील पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायतींचे धनादेश सहाय्यक माहिती अधिकारी संध्या गरवारे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, अरुण चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सुनील पांगम, संजय कवटकर उपस्थित होते.
गरवारे यांनी सांगितले की, आतापर्यंत लोकराज्य ग्राम होण्याचा २३ हा उच्चांक होता. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ ग्रामपंचायती लोकराज्य ग्राम झाल्या आहेत. कणकवली तालुक्यातील कमी कुटुंबसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना प्राधान्य देऊन हे उद्दिष्ट साध्य केले आहे. लोकराज्य ग्राम ही संकल्पना २०११ पासून आम्ही सिंधुदुर्गात राबविली. कणकवली तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींमधून ७५९० वर्गणीदार एकाचवेळी करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)