‘अंनिस’तर्फे कोल्हापुरात युवा संकल्प मेळावा
By Admin | Updated: December 24, 2015 23:49 IST2015-12-24T23:07:23+5:302015-12-24T23:49:32+5:30
अंधश्रद्धेविरोधात लढा : दाम्पत्य हत्त्या प्रकरणाचा निषेध

‘अंनिस’तर्फे कोल्हापुरात युवा संकल्प मेळावा
सातारा : ‘मागील आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्ये इंद्रजित आणि मेघा कुलकर्णी यांनी आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनामध्ये ठेवून मेघा यांचा भाऊ गणेश आणि महेंद्र पाटील यांनी हत्या केली. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून भावानेच बहिणीचा आणि भावजींचा खून करणे ही अत्यंत निंदणीय गोष्ट असून, अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कृत्याचा तीव्र निषेध करीत आहे,’ अशी माहिती ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.जात ही एक कोणताही वैज्ञानिक आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, अशी मांडणी डॉ. नरेंद्र दाभोलकर सातत्याने करीत आले होते. त्यांच्या नेतृत्वखाली अंनिस गेली पंधरा वर्षे सातत्याने आंतरजातीय विवाहांना पाठबळ देण्याचे काम करीत आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. याच कामाचा एक भाग म्हणून जातीय प्रतिष्ठेचे बळी संजयमध्ये घडू नयेत, यासाठी २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे युवा संकल्प मेळावा घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. यावेळी ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी आणि युवा विभाग राज्य कार्यवाह कृष्णात कोरे उपस्थित राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.जातप्रथा मोडण्यासाठी आंतरजातीय विवाह हे सगळ्यात प्रभावी हत्यार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार तरुण मुले, मुली आणि त्यांचे पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानामध्ये करण्यात येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तरुण-तरुणींपर्यंत हा संदेश पोहोचविण्याची मोहीम अंनिस राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एक नोव्हेंबरपासून महाराष्ट्र अंनिसने जोडीदाराची विवेकी निवड हे अभियान सुरू केले आहे. तरुण मुला-मुलींना जात, धर्म निरपेक्ष केवळ गुणवत्ता पूर्ण पद्धतीने जोडीदार करता यावा, यासाठीचे हे अभियान जातीय प्रतिष्ठेच्या बळींच्या अनुषंगाने आणखीन तीव्र करणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
ज्याप्रमाणे हरियाणामध्ये राज्य शासनाच्या पुढाकाराने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण दिले जाते. तशीच योजना महाराष्ट्र शासनाने देखील राबवावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकर कणसे, सचिव वसीम बागवान, उदय चव्हाण, भगवान रणदिवे, शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास जांभळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जात मोडीत काढणार...
लातूरच्या ‘अंनिस’च्या शाखेमार्फत अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या पुढाकाराने आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक आंतरजातीय विवाह लावले आहेत. यामध्ये सर्व जातीच्या जोडप्यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर, सांगली, वर्धा याठिकाणीही आंतरजातीय विवाह सहाय्यता केंद्र चालवीत आहे. जात मोडण्यासाठी आंतरजातीय विवाह कार्यासाठी इच्छुक जोडप्यांनी ‘अंनिस’शी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.