शेतीपूरक व्यवसाय म्हणून तरुणांनी मधुमक्षिका पालनाकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST2021-02-21T05:12:44+5:302021-02-21T05:12:44+5:30
सातारा : ‘शेतकऱ्यांची नवी पिढी शेतीपूरक व्यवसाय करीत आहे. मधुमक्षिकापालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन असून, याकडे शेतकऱ्यांच्या नव्या ...

शेतीपूरक व्यवसाय म्हणून तरुणांनी मधुमक्षिका पालनाकडे वळावे
सातारा : ‘शेतकऱ्यांची नवी पिढी शेतीपूरक व्यवसाय करीत आहे. मधुमक्षिकापालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन असून, याकडे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून पाहावे,’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मध संचालनालय, महाबळेश्वर येथील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व विविध उपक्रमांचा प्रारंभ उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जे. मो. अभ्यंकर, प्रधान सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ डॉ. नीलिमा केरकेट्टा, मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकरी मधुमक्षिकापालन करीत आहेत. त्याचे फायदे आज दिसत आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये जाम आणि जेलीच्या ठिकाणी मधाची बाटली देत आहेत. मध संचालनालयाने शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबाबत प्रशिक्षित करावे, जेणेकरून ते या व्यवसायाकडे वळतील. महाबळेश्वरच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून महाबळेश्वरचा विकास करण्यात येईल व पर्यटनाला अधिकची चालना मिळेल. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अनेक चांगल्या योजना आहेत.’
राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ‘स्थानिक उपलब्धता आहे त्यातूनच उद्योग उभे करण्यावर शासनाचा भर आहे. मधाच्या सेवनामुळे आरोग्य चांगले राहते. या मधाचे लहान मुलांनी, गरोदर मातांनी रोज एक चमचा सेवन केले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये शासनामार्फत पोषण आहार दिला जातो. या पोषण आहाराबरोबर विद्यार्थ्यांना एक चमचा मध सेवनासाठी मिळेल यासाठी पाठपुरावा करणार आहे.’
श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘मध संचालनालयास भेट देण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मधाची निर्मिती कशी होते याची चित्रफीत दाखवावी.’
प्रधान सचिव डॉ. नीलिमा केरकेट्टा यांनी प्रास्ताविक केले. दिग्विजय पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमात माजी आमदार सदाशिव सपकाळ, नितीन बानगुडे-पाटील, बाळासाहेब भिलारे, डी. एम. बावळेकर उपस्थित होते.
चौकट
शेतकऱ्यांच्या उन्नतीत वाढ
महाबळेश्वर व परिसरातून एक लाख किलो मध संकलित केला जातो. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत भर पडत आहे. बाजारपेठेत सेंद्रिय मालाला मागणी आहे. सेंद्रिय निर्मितीवर भर द्यावा. आज मध संचालनालयाची सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आहे. या इमारतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊर्जितावस्था मिळेल यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
फोटो२०महाबळेश्वर सुभाष देसाई
महाबळेश्वर येथे शनिवारी मध संचालनालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.