यंदाचे वर्षही सातारकरांसाठी खड्ड्यातच!

By Admin | Updated: April 30, 2015 00:25 IST2015-04-29T23:27:20+5:302015-04-30T00:25:03+5:30

पालिकेला मिळेना मुहूर्त : राजपथचे डांबरीकरण न होण्याची धूसर चिन्हे, प्रशासकीय दिरंगाईचा फटका

This year even in the cave for the Satarkar! | यंदाचे वर्षही सातारकरांसाठी खड्ड्यातच!

यंदाचे वर्षही सातारकरांसाठी खड्ड्यातच!

सातारा : शहराचा मुख्य रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजपथावर पाईपलाईनसाठी तब्बल ३८ चरी खोदण्यात आल्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून या चरी केवळ थातूरमातूर भरून पालिका प्रशासनाने याकडे पाठ फिरविल्याची दिसून येत आहे. राजपथचे डांबरीकरण यंदा होतेय की नाही, याची शाश्वती आता कोणालाही नाही. पंधरा मे पर्यंत जर प्रशासनाने हालचाली केल्या तरच राजपथचे डांबरीकण होईल, अन्यथा सातारकरांना २०१५ सालातही खड्ड्यातून वाट काढत जावे लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. शहराची मुख्य ओळख असणाऱ्या राजपथ रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. पालिकेला या रस्त्याच्या डांबरीकरणास मुहूर्त केव्हा मिळणार आणि खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कधी हटणार याकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी पोवई नाक्यापासून शाहू चौकापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. परंतु तिथून पुढे राजवाड्यापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ठिकठिकाणी राजपथावर तब्बल ३८ चरी खोदण्यात आल्या. पाईपलाईनचे काम संपल्यानंतर या चरी माती व दगडाने भरण्यात आल्या; परंतु काही चरी अद्यापही भरण्यात आल्या नाहीत. पाच-पाच फुटांवर असलेल्या या चरींमुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. काहीना मणक्याचे विकारही जडले आहेत. काहीजण राजपथावरून न जाता पर्यायी रस्त्याने पोवई नाक्याकडे जातात. वाहनचालक अचानक ब्रेक लावत असल्यामुळे वाहने एकमेकांवर आदळत असल्याचे प्रकारही घडत आहेत. राजवाडा ही मुख्य बाजार पेठ असल्यामुळे राजपथावर विशेषत: नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. पाचशे मीटरचे अंतरही पार करणे वाहनचालकांना आता नकोशे झाले आहे. राजपथच्या डांबरीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीची आवश्यकता आहे. गेल्या महिनाभरापासून पालिका प्रशासन अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे अजून किती दिवस सातारकरांना राजपथावरून कोकर उड्या घेत जावे लागणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) १५ दिवसांत काय होणार? मे महिना अगदी तोंडावर आला असताना अद्यापही राजपथ रस्त्याचे डांबरीकरणासंदर्भात काहीच हालचाली नाहीत. १५ मे नंतर अवकाळी पावसास सुरूवात होेते. त्यामुळे पालिकेच्या हातात केवळ १५ दिवस आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी, निविदा काढणे ही कामे करावी लागणार आहेत. त्यानंतरच रस्त्याच्या डांबरीकणास सुरूवात करता येणार आहे. परंतु हे सोपस्कार तातडीने पुर्ण केले तरच यंदा राजपथचे डांबरीकरण होईल, अन्यथा यंदाही सातारकरांना खडतर प्रवास करावा लागणार, यात काही शंका नाही.

Web Title: This year even in the cave for the Satarkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.