यशवंतराव मोहिते राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:46 IST2019-04-05T22:46:17+5:302019-04-05T22:46:22+5:30
दीपक शिंदे सातारा लोकसभा मतदार संघात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस पक्षाची धुरा प्रतापराव भोसले यांच्याकडे आली. तर कºहाड लोकसभा ...

यशवंतराव मोहिते राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम
दीपक शिंदे
सातारा लोकसभा मतदार संघात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस पक्षाची धुरा प्रतापराव भोसले यांच्याकडे आली. तर कºहाड लोकसभा मतदार संघावरही काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. आनंदराव चव्हाण यांच्यानंतर प्रेमलाताई चव्हाण, तर राजकारणात कुठे थांबावे आणि कसे राहावे याचे उत्तम उदाहरण असलेले यशवंतराव मोहिते यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले.
यशवंतराव मोहिते यांनी स्वातंत्र्य चळवळीपासूनच राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रि य सहभाग घेतला होता. शेतकरी कामगार पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली १९४८ मध्ये झाल्या. त्यावेळी यशवंतराव चव्हाणदेखील या पक्षात येतील अशी अपेक्षा होती; पण ते आले नाहीत.
१९५२ ची विधानसभेची निवडणूक यशवंतराव मोहिते यांनी शेकापतर्फे लढविली व जिंकली. १९६० मध्ये ते काँग्रेसचे सदस्य झाले व संयुक्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृह उपमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात यशवंतराव मोहिते यांनी कृषी उपमंत्री, गृहनिर्माण आणि परिवहन, अन्न व नागरी पुरवठा, सहकार, अर्थमंत्री अशी विविध पदे भूषविली.
१९८० मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन पक्ष त्यावेळी निर्माण झाले होते. यशवंतराव चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाणांचा पराभव कोणीच करू शकणार नाही, असे त्यांनी इंदिरा गांधी यांना स्पष्टपणे सांगितले; पण किमान कºहाड लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी इंदिरा गांधी यांनी कºहाडमधून यशवंतराव मोहिते, सांगलीतून वसंतदादा पाटील आणि साताऱ्यातून शालिनीताई पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी ते कºहाड लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आले.
पुढे इंदिरा गांधी आणि यशवंतराव मोहिते यांच्यामध्येही दरी निर्माण झाली आणि इंदिरा गांधी असेपर्यंत आपल्याला भविष्य नाही, असे त्यांचे मत बनले. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतरही ते खासदार होते; पण ते दिल्लीला गेले नाहीत. त्यांनी १९८५ मध्ये लोकसभेची मुदत संपताच गावाकडे निघून गेले.