यशवंतराव चव्हाण थोर साहित्यिक
By Admin | Updated: November 27, 2015 00:40 IST2015-11-26T21:03:26+5:302015-11-27T00:40:47+5:30
सदानंद मोरे : ‘कालिकादेवी’तर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे वितरण

यशवंतराव चव्हाण थोर साहित्यिक
कऱ्हाड : ‘सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य हे या दोन मतप्रवाहात संघर्ष होत राहिले. पण लोकमान्य टिळकांनंतर यशवंतराव चव्हाण यांनी दोन्ही विचारांमध्ये सुवर्णमध्य साधून महाराष्ट्र घडण्यासंदर्भात मतप्रवाह तयार केला. त्यांनी देशपातळीवर राज्याची ओळख निर्माण केली. यशवंतरावांनी सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करत राजकीय स्वातंत्र्यालाही प्राधान्य दिले. यशवंतराव चव्हाण थोर राजकारणी तसेच थोर साहित्यिकही होते,’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.येथील कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने डॉ मोरे यांना यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘सामाजिक कृतज्ञता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित होते. यावेळी कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान-सावकार, संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण, ज्येष्ठ संचालक बाबूराव सुर्वे, डॉ. संतोष मोहिरे, अरुण जाधव, उपाध्यक्ष राजन वेळापुरे, शाम वेळापुरे, बाळासाहेब मोहिरे, शरदचंद्र देसाई, राजेंद्र साठे, अनिल सोनवले, डॉ. जयंवत सातपुते, राजाभाऊ मंगसुळीकर, सुरेखा मोरे, जयाराणी जाधव, सीमा विभूते, अरुंधती चव्हाण, व्यवस्थापक विवेक वेळापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मोरे म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीत राज्याचे नेतृत्त्व करताना संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, जोतिबा फुले ही मुख्य प्रतीके मानली. मराठी माणसाला जे हवे आहे ते आत्मसात करत साहित्य, कुस्ती, तमाशा, भजनाशी संगत केली. म्हणूनच ते महाराष्ट्र समजूही शकले आणि बदलूही शकले. नेतृत्त्व करण्यासाठी जे घटक आवश्यक आहेत ते त्यांनी इतरांतून स्वीकारले.’
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रौप्य महोत्सवी सेवेबद्दल संचालक बाळासाहेब मोहिरे, डॉ. संतोष मोहिरे, शाम वेळापुरे, बाबूराव सुर्वे, व्यवस्थापक विवेक वेळापुरे व सेवक सर्जेराव घारे यांचा सत्कार करण्यात आला. सुरेखा मोरे यांचा अरुंधती चव्हाण यांनी सत्कार केला.
यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, माजी प्राचार्य व्ही. टी. घारपुरे, प्रा. बी. के. घाटगे, प्रा. शिरीष गोडबोले, मेजर शंकर डांगे, मारूती कुरकुटे, साहित्यिक माणिक बनकर, उपप्राचार्य अशोक अटकर व मान्यवर उपस्थित होते. प्रा. अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मंगसुळीकर यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. संतोष मोहिरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)