तब्बल ९७० उमेदवारांकडून अर्ज माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:01+5:302021-01-08T06:08:01+5:30
फलटण : फलटण तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तब्बल ९७० उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. ...

तब्बल ९७० उमेदवारांकडून अर्ज माघार
फलटण : फलटण तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तब्बल ९७० उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात १२७० उमेदवार उभे आहेत. तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून १३८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
फलटण तालुक्यात तब्बल २४०८ अर्ज दाखल झाले होते. २६ अर्ज बाद झाल्याने ऐंशी जागांसाठी २३७८ उमेदवार उभे होते. आता ७४ ग्रामपंचायतींसाठी १२७० उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील डोंबाळवाडी, काशीदवाडी, वाघोशी, तडवळे, रावडी खुर्द, ढवळेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर सांगवी ग्रामपंचायतीचे प्रभाग दोन व प्रभाग तीन, विंचुर्णी ग्रामपंचायतीचे प्रभाग तीन, बोडकेवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग १ व प्रभाग ३, कोऱ्हाळे ग्रामपंचायतीचे प्रभाग २, वडगाव ग्रामपंचायतीचा प्रभाग एक, कोरेगाव ग्रामपंचायतीचे प्रभाग ३, जिंती ग्रामपंचायतीचे प्रभाग ४, खुंटे ग्रामपंचायतीचा प्रभाग १, पिराचीवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग ३, गुणवरे ग्रामपंचायतीचे प्रभाग ५, आंदरुड ग्रामपंचायतीचे प्रभाग २, मिरढे ग्रामपंचायतीचा प्रभाग १, शेरेशिंदेवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग २, निरगुडी ग्रामपंचायतीचे प्रभाग १, प्रभाग ३, प्रभाग ४ हे बिनविरोध प्रभाग झालेले आहेत.
तालुक्यावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या गटाकडून इच्छुकांची गर्दी होती. अनेक गावांमध्ये राजे गटाअंतर्गतच दोन-तीन पॅनेल होण्याची शक्यता दिसत होती. बंडाळी होऊ नये म्हणून स्वतः रामराजे यांनी अनेक इच्छुकांना बोलावून बंडाच्या तयारीत असणाऱ्यांना थंड करीत अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे राजे गटाअंतर्गत होणारी बंडखोरी टळली आहे. त्यांना मानणारे अनेकजण बिनविरोध निवडून आले आहेत.
दुसरीकडे राजे गटाच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गटाने कंबर कसली आहे. बहुसंख्य ग्रामपंचायतीत त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. खासदार गटातून बाहेर पडलेले दिगंबर आगवणे यांनीही आपल्या समर्थक इच्छुकांना अनेक ग्रामपंचायतींमध्ये उभे केले आहे, तर काहींना बाहेरून ताकद दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
चौकट :
तहसील कार्यालयात गर्दी
अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच चिन्ह वाटप होणार असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती. इच्छुक नाराजांची मनधरणी करताना अनेक पॅनेलप्रमुख दिसत होते. जे उमेदवार माघार घेणार होते, त्यांच्यासाठी खास वाहनांचीही सोय त्या-त्या गावातील पॅनेल प्रमुखांनी केली होती.