पवनचक्की कंपन्यांची मुजोरी सहन करणार नाही
By Admin | Updated: May 25, 2015 00:31 IST2015-05-24T22:54:02+5:302015-05-25T00:31:19+5:30
मोझर यांचा पत्रकाद्वारे इशारा

पवनचक्की कंपन्यांची मुजोरी सहन करणार नाही
सातारा : ‘सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ पाटण येथील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. पवनचक्की कंपन्यांची मुजोरी आम्ही सहन करणार नाही,’ असा इशारा ‘मनसे’च्या संदीप मोझर यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाटण तालुक्यात पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविषयी ‘लोकमत’च्या दि. २४ मे च्या अंकात मांडलेल्या शेतकऱ्यांच्या कैफियत वाचून कार्यकर्त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या वेदना काय असतात. हे जवळून अनुभवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासकामांच्या नावाखाली शेतकऱ्यांना भुरळ घालून गळचेपी करणाऱ्या व जमीन बळकावू पाहणाऱ्या पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार मनसैनिक कदापि सहन करणार नाही.
या बाबतीत विनाविलंब शेतकरी व पवनचक्की कंपनीच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली असून, सत्यपरिस्थिती फारच विचित्र असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवरील अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल; पण पवनचक्की कंपन्यांची मुजोरी मनसैनिकांकडून सहन केली जाणार नाही. पवनचक्की कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला न देता शेतकऱ्यांच्याच जागेतून रस्ता करून शेतकऱ्यांवरचं खोट्या तक्रारी दाखल करून पैशाच्या जोरावर तेथील भूमिपुत्रांना तुरुंगात पाठविले आहे. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे, या बद्दल तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.
यापुढे शासकीय रस्ता सोडून शेतकऱ्यांच्या मालकीचा जमिनीतून योग्य तो मोबदला न देता गाड्यांची ने-आण सुरूचं राहिल्यास व शेतकऱ्यांना केवळ आश्वासने देऊन ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे स्टाईलने पवनचक्की कंपन्यांना उत्तर दिले जाईल. व या पुढे होणाऱ्या सर्व बाबींना पवनचक्की व्यवस्थापनच जबाबदार असेल,’ असा इशारा मोझर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)