पत्नीचा गळा चिरून पतीची आत्महत्या
By Admin | Updated: December 3, 2015 00:41 IST2015-12-03T00:34:31+5:302015-12-03T00:41:30+5:30
वाई तालुक्यात थरार : हल्ल्यात जखमी झालेला मुलगाही गंभीर

पत्नीचा गळा चिरून पतीची आत्महत्या
वाई : घरगुती कारणामुळे पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून करणाऱ्या पतीने नंतर आपल्या पोटच्या पोरावरही हल्ला करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना वाई तालुक्यातील बोरगाव येथे बुधवारी सकाळी घडली. या घटनेत पती-पत्नीचा अंत झाला असून, मुलगा जबर जखमी आहे. वाई तालुक्यासह जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.
विजय दगडू वाडकर (वय ४३) आणि त्याची पत्नी सारिका (३४) या दोघांचा मृत्यू झाला असून, त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अथर्व रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घरगुती ताणतणावातून ही भीषण घटना उद््भवली. विजय वाडकर हा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे वास्तव्यास आहे. त्याला अथर्व हा मुलगा आणि ऋतिका (१३) ही मुलगी आहे. विजय हा मुंबई-वाई मार्गावर खासगी वाहतूक कंपनीत काम करीत होता. विवाह झाल्यापासूनच पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असत. वरचेवर भांडणे होत असल्याने विजयसह संपूर्ण कुटुंबच एक वर्षापूर्वी कोपरखैरणे येथे वास्तव्यास गेले. काही दिवसांपूर्वी विजयची पत्नी सारिका एका कंपनीत कामाला जाऊ लागली होती. ही बाब विजयला खटकली होती आणि भांडणे वाढली होती. ‘तू कामास जायचे नाही,’ असे तो तिला वारंवार सांगत होता.
दिवाळीच्या सुटीत कुटुंब गावी आले होते. गेल्या शनिवारी ते पुन्हा मुंबईला परतले. दरम्यान, मंगळवारी (दि. १) रात्री विजय मुंबईहून कुटुंबाला घेऊन बोरगावला आला. त्याच वेळी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबईला जाण्याच्या कारणावरून दोघांचे पुन्हा जोरदार भांडण सुरू झाले. विजयची आई अंगणवाडी सेविका असून, अंगणवाडी घरासमोरच आहे. श्रुतिका आणि अथर्व हे आपल्या आजीबरोबर अंगणवाडीत बसले असतानाच घरात भांडण विकोपाला गेले. त्यातून विजयने पत्नी सारिकावर चाकूने हल्ला केला आणि क्रूरपणे गळा चिरून तिचा खून केला. सारिकाचा आवाज ऐकून विजयची आई आणि अथर्व धावत घराकडे गेले. मात्र, संतापाच्या भरात विजयने अथर्वलाही सोडले नाही. त्याच्या मानेवर आणि पोटावर त्याने चाकूने वार केले. परंतु जखमी अवस्थेतही तो धडपडत दूर जाण्यात यशस्वी ठरला. नंतर विजय तसाच रस्त्यावर आला आणि त्याने स्वत:चा गळा चिरून घेतला.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे तातडीने घटनास्थळी पोहोचले. विशाल महादेव धनवडे यांनी वाई तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, उपनिरीक्षक खरात पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
रक्ताचे थारोळे अन किंकाळ्या
विजयने पत्नीवर मागून हल्ला केला आणि चाकूने निर्दयीपणे तिचा गळा चिरला. भांडणाच्या चढत्या आवाजात तिची किंकाळी मिसळली आणि तिथून पुढे फक्त आरडाओरडा आणि किंकाळ्याच स्थानिकांना ऐकू आल्या. विजयने रस्त्यावर येऊन जेव्हा स्वत:च्या गळ्यावर चाकू चालविला, तेव्हा शेजारीच राहणारे विशाल धनवडे धावत आले. जखमी विजयला तातडीने वाईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात प्रचंड घबराट पसरली होती. छोट्या अथर्वची प्रकृती गंभीर, पण स्थिर असल्याचे सांगण्यात आले.