सातारा बनणार ‘वाय-फाय सिटी’!
By Admin | Updated: September 11, 2014 23:06 IST2014-09-11T22:45:26+5:302014-09-11T23:06:22+5:30
प्रस्ताव मागविला : राज्य पालिका खात्याच्या संचालक मिता राजीवलोचन यांची भेट

सातारा बनणार ‘वाय-फाय सिटी’!
सातारा : ‘पालिकेतर्फे शहरात राबविलेले प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. साताऱ्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. यात भर घालण्यासाठी मेट्रो सिटीच्या धर्तीवर सातारा शहरात ‘वाय-फाय’चा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल. तसेच साताऱ्याच्या ‘वाय-फाय सिटी’बाबतचा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे सादर करावा,’ अशी सूचना महाराष्ट्र नगरपालिका प्रशासनालयाच्या आयुक्त तथा संचालक मिता राजीवलोचन यांनी केली. मिता राजीवलोचन यांनी आज, गुरुवारी सातारा पालिकेला भेट दिली. दुपारी १२ वाजता त्यांनी कमिटी हॉलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगरसेवक अविनाश कदम, अॅड. दत्ता बनकर, सुजाता राजेमहाडिक, विजय बडेकर, अमोल मोहिते, कल्याण राक्षे, भाग्यवंत कुंभार, आदी उपस्थित होते.सातारा शहरात पालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, भाजी व फ्रूट मार्केटचा प्रश्न मार्गी लावण्यात आला, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तळी बांधली, आदी उपक्रमांचे राजीवलोचन यांनी कौतुक केले. या बैठकीत नगरसेवक अविनाश कदम यांनी साताऱ्याला ‘वाय-फाय सिटी’ बनविण्याच्या अनुषंगाने शासनाची मदत मिळावी, अशी मागणी केली. शहरात इंटरनेट युजर्स आहेत. मात्र, स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने शहरातील सामान्य कुटुंबातील मुलांसाठीही विनामूल्य माहितीचा खजिना उपलब्ध व्हावा, या हेतूने शासनाने साताऱ्यात ‘वाय-फाय सिटी’ करण्याचा प्रकल्प राबवावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर राजीवलोचन यांनी सहमती दर्शविली. सविस्तर प्रस्ताव पालिकेने तयार करावा व तो शासनाकडे सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे : जिल्हाधिकारी
मध्य प्रदेशमध्ये ’वाय-फाय’ सिटीचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्याच पद्धतीचे मॉडेल तयार करता येऊ शकते. मात्र, काहीजण पासवर्ड हॅक करून त्याचा गैरवापर करू शकतात. याबाबतची सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे असल्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बैठकीत केली.