‘नरक’यातनेतून आमची सुटका कधी होणार?
By Admin | Updated: August 18, 2015 22:40 IST2015-08-18T22:40:37+5:302015-08-18T22:40:37+5:30
महिलांचा संतप्त सवाल : मैलाप्रकरणी सदर बझार रहिवाशांनी घातला नगरसेविकांना घेराव--इथे ओशाळली माणुसकी...

‘नरक’यातनेतून आमची सुटका कधी होणार?
सातारा : कामगारांनी शौचालयाच्या टाकीतला मैला बादलीनं उपसून शेजारच्या नाल्यात ओतून दिलाय. अजूनही मैला तसाच साचून बसलाय. दुर्गंधीनं सगळा परिसर घाणतोय. अन्नाचा घासही घशाखाली उतरत नाय. डास, माश्या घरभर घोंघावतायत. घाणीनं जीव गुदमरून गेलाय... या ‘नरक’यातनेतून आमची सुटका कधी होणार, असा संतप्त सवाल व्यक्त करत मंगळवारी येथील महिलांनी नगरसेविकांना घेराव घातला अन् स्वच्छतेची मागणी केली. गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ने सदर बझार येथील ‘मैलाप्रकरण’ उजेडात आणले होते. येथील नवीन भाजीमंडईशेजारील सार्वजनिक शौचालयाची टाकी स्वच्छ करण्याचे काम पालिकेच्या ठेकेदाराने सुरू केले होते. परिसरातील रहिवाशांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने स्वच्छता करणे गरजेचे होते. मात्र, कामगारांनी टाकीतील मैला उपसून शेजारच्या नाल्यात ओतला, तसेच मैला भरलेले दोन बॅरलही नाल्यात ओतल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या घटनेला दहा दिवस उलटूनही पालिका प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही. दुर्गंधीच्या त्रासाला कंटाळून अखेर संतप्त महिलांनी आज (मंगळवार) येथील नगरसेविकांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. विशेष म्हणजे या वार्डाच्या नगरसेविका असलेल्या भारती सोळंकी यांना हा प्रकार माहीतच नसल्याचे त्यांनी सांगितले, तर नगरसेविका मुमताज चौधरी यांनी हे काम माझ्या वार्डात येत नाही, अशी बोळवण केली. या प्रकाराने सारेच चक्रावले असून आम्हाला कोणी वाली आहे की नाही, असा संतप्त सवाल रहिवांशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. (प्रतिनिधी) पंपाने मैला उपसला, मग बॅरलमध्ये काय भरले? शौचालयाची टाकी स्वच्छ करण्याचे काम ठेकेदाराने सुरू करण्यापूर्वी पालिका प्रशासनाने खासगी सक्शन गाडीच्या पंपाने मैला उपसून दिल्याचे म्हटले होते. मग कामगारांनी बादलीच्या साह्याने टाकीतून काय उपसले? बॅरलमध्ये भरले ते काय होते आणि आजही नाल्यामध्ये साचून राहिले आहे, ते काय आहे? असे अनेक सवाल यावेळी रहिवाशांनी उपस्थित केले. ‘त्या’ शौचालयाकडे अजूनही दुर्लक्षच ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी पालिका प्रशासनाने करणे आवश्यक होते. पालिकेचे अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित असते तर कामगारांनी मैला उपसून नाल्यात ओतला नसता. पण तसे झाले नाही. काम झाल्यानंतरही अधिकाऱ्यांनी याठिकाणाची पाहणी केलेली दिसत नाही. हे अमानवी कृत्य पालिकेने गांभीर्याने घेतलेले नाही, हेच यावरून सिद्ध होते.