कऱ्हाडात.. ‘वाय-फाय’ हाय काय, नाय काय!
By Admin | Updated: November 1, 2015 23:39 IST2015-11-01T23:39:04+5:302015-11-01T23:39:04+5:30
नागरिकांत संभ्रम : नोव्हेंबर सुरू होऊनही कार्यवाही नाही; दराबाबतही चुप्पी; प्रकल्पाची जागा अद्यापही अनिश्चित

कऱ्हाडात.. ‘वाय-फाय’ हाय काय, नाय काय!
कऱ्हाड : ‘यंग जनरेशन’च्या व व्यावसायिकतेच्या दृष्टिकोनातून हिताचा असणारी ‘वाय-फाय’ सुविधा कऱ्हाड शहरात उपलब्ध करण्यात येणार आहे. या सुविधेविषयी गत महिन्यात पालिकेच्या विशेष सभेमध्ये ठरावही संमत करण्यात आला. त्यानंतर शहरात सुविधा उभारण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत. मात्र, ‘वाय-फाय’च्या दराबाबत अजूनही योग्य माहिती मिळू शकलेली नसल्याने संभ्रावस्था निर्माण झाली आहे.
‘वाय-फाय’ सुविधा सर्वांच्या हिताची आहे. मात्र, त्याला किती रक्कम मोजावी लागणार, या प्रश्नासह सुविधा कधी सुरू होणार याविषयीही सर्वांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. गत महिन्यात झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत कऱ्हाड शहर ‘वाय-फाय’ करण्याचा ठराव मांडण्यात आला. ही ‘वाय-फाय’ची सुविधा नागरिकांसह विद्यार्थ्यांना परवडेल की नाही, या विषयांसह अनेक महत्त्वाचे विषय सभेदरम्यान चर्चेस घेण्यात आले. अखेर सर्वांच्या चर्चेनंतर ‘वाय-फाय’चा विषय मंजूर करण्यात आला. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आलेला ‘वाय-फाय’चा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मांडला. त्याला विरोधकांकडून जोरदारपणे विरोध दर्शविण्यात आला. योग्य दरामध्ये ही सुविधा देण्याची मागणीही विरोधकांनी केली. अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी दर देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
‘वाय-फाय’ची सुविधा तीन महिने मोफत देण्यात येणार असल्याने त्याचा कऱ्हाडकरांना नक्कीच फायदा होणार आहे. मात्र, त्यानंतर या सुविधेसाठी किती पैसे मोजावे लागणार? याविषयी सध्या कऱ्हाडकरांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पालिकेने कंपनीशी जाचक अटी वगळून करार केला असून, व्यावसायिक तत्त्वावर ही सुविधा दिला जाणार आहे. ही ‘वाय-फाय’ची सुविधा नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जरी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असले तरी किती दिवसांत ही सुविधा कऱ्हाडकरांपर्यंत पोहोचेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.पालिकेने कंपनीशी करार केला असला तरी पालिकेच्या अटींची कंपनीकडून योग्यप्रकारे पूर्तता केली जाते की नाही, हे महत्त्वाचे ठरणार आहे. कंपनीने पालिकेकडे ‘वाय-फाय’चा प्रकल्पासाठी जागा मागितली आहे. शहरातील कोणत्या ठिकाणी पालिका कंपनीला प्रकल्पासाठी जागा देणार?, जागा दिल्यास त्याचे भाडे कंपनीकडून पालिका घेणार का? अशा अनेक शंका नागरिकांमधून निर्माण होत आहेत. (प्रतिनिधी)
कऱ्हाड शहरात पालिकेकडून ‘वाय-फाय’ची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याने त्याचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटच्या सुविधा जास्त प्रमाणात नसतात. त्यामुळे आम्हाला शहरात येऊन इंटरनेट तसेच कॉलेजच्या नेटमध्ये बसून नेट वापरावे लागते. ही सुविधा मोफत मिळणार असल्याने याचा नक्कीच फायदा होईल.
- वैभव कांबळे, विद्यार्थी, विंग
येथे मिळणार सेवा
शहरातील मध्यवस्तीच्या ठिकाणी ‘वाय-फाय’ची सुविधा सुरुवातीला सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील चावडी चौक, दत्तचौक, कृष्णा घाट, कन्याशाळा आदी ठिकाणी नागरिकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.