पगार थकल्यावरही आणावं लागतंय लढायचं बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:43+5:302021-01-08T06:07:43+5:30

कोरेगाव : कोरोना काळात घराबाहेर पडण्यास लोक धजावत नसताना, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम ...

We have to bring strength to fight even when salary is tired! | पगार थकल्यावरही आणावं लागतंय लढायचं बळ!

पगार थकल्यावरही आणावं लागतंय लढायचं बळ!

कोरेगाव : कोरोना काळात घराबाहेर पडण्यास लोक धजावत नसताना, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. शासनाकडून त्यांचा गौरव होणे दूरच पण या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अद्याप थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी पध्दतीने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची दहा वर्षे सेवा झाली आहे. तरी अत्यल्प वेतनावर काम करावे लागत आहे. कोरोनात संशयित रुग्णांचा शोध घेणे, त्याच्या घर परिसराचा भाग पिंजून काढून तपासणी मोहीम राबवणे, औषधे उपलब्ध करुन देणे, याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांनुसार सर्वेक्षण करणे आदी कामे आरोग्य कर्मचाऱ्यांनी ऊन, वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता प्रामाणिकपणे केली आहेत.

लॉकडाऊन काळात हॉटेल, कॅन्टिन बंद असताना वेळप्रसंगी उपाशी राहून, सरकारने नेमून दिलेली कामे प्रामाणिकपणे केली. मात्र, त्यांच्या वाट्याला हेटाळणी आली आहे. आरोग्य विभागाने केवळ कागदोपत्री आदेश देण्याचे काम दहा महिन्यांच्या कालावधीत केले. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. स्थानिक पातळीवर स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कामाची दखल घेऊन कोविड योध्दा पुरस्काराने त्यांना सन्मानित केले, मात्र सरकारने लक्षही दिले नाही.

सरकारने केवळ या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे कळविले आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुसूत्रीकरण केले आहे. १ एप्रिल २०१८ पासून वेतनवाढ दिली आहे. वेतनवाढीसह दोन वर्षांची थकबाकी दिवाळीपूर्वी देण्याबाबत सरकारने आदेश दिले होते. मात्र, दिवाळी उलटून गेल्यानंतरही हालचाल झाली नाही. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला काही तरी लाभ मिळेल, अशी आशा या कर्मचाऱ्यांना होती. तीही फोल ठरली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेऊन मार्च महिन्यापूर्वी थकबाकीची रक्कम द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

चौकट :

सुप्रिया सुळेंना भेटणार

कोरेगाव तालुक्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. याबाबत लवकरच कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडणार आहे. दहा वर्षे काम करुनसुध्दा, सरकार सापत्नपणाची वागणूक देत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याबरोबर विशेष बैठक घेण्याबाबत खासदार सुळे यांना विनंती करणार असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Web Title: We have to bring strength to fight even when salary is tired!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.