नाट्य संमेलन आम्ही नाकारले नाहीच!

By Admin | Updated: November 25, 2015 23:51 IST2015-11-25T23:51:29+5:302015-11-25T23:51:29+5:30

सातारा शाखेचा दावा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीचा होता प्रस्ताव; मैदानही केले होते आरक्षित

We did not reject the Natya Sammelan! | नाट्य संमेलन आम्ही नाकारले नाहीच!

नाट्य संमेलन आम्ही नाकारले नाहीच!

राजीव मुळ्ये ल्ल सातारा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलन आयोजित करण्यास नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने असमर्थता दर्शविली आणि ठाण्याचे नाव पक्के झाले, अशी चर्चा असली तरी आयोजनास नकार कधी कळविलाच नव्हता, अशी माहिती सातारा शाखेकडून देण्यात आल्याने चर्चेची दिशाच बदलली आहे. आम्ही काटकसरीने उत्तम संमेलन आयोजित करू, अशी ग्वाही सातारा शाखेने दिली होती आणि तयारीही सुरू केली होती, असेही सांगण्यात आले.
गेली चार वर्षे सातारा शाखेकडून नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जात आहे. २०११ मध्ये रत्नागिरी संमेलनात असे पत्र प्रथम देण्यात आले. नंतरची चार वर्षे या ना त्या कारणामुळे साताऱ्याला यजमानपद मिळू शकले नाही. त्यामुळे यावर्षी साताऱ्याचे नाव चर्चेत आघाडीवर होते. परंतु मध्यंतरी दोन वेळा दोन वेगवेगळ्या कारणांनी सातारा शाखा यजमानपदास अनुत्सुक असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या. विशिष्ट व्यक्ती अध्यक्षपदी असेल, तरच साताऱ्याला संमेलन घेऊ असे सातारा शाखेचे म्हणणे आहे, असे एक कारण सांगितले गेले. दुष्काळामुळे निधी संकलनात मर्यादा असल्याचेही कारण पुढे आले. परंतु कोणत्याही अटीविना, कोणत्याही परिस्थितीत आम्ही संमेलन घेण्यास तयार होतो, असे सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्यातील तीन दिवस नाट्य संमेलनासाठी जिल्हा परिषदेचे मैदान आरक्षित केले आहे आणि हे आरक्षण अजूनही रद्द केलेले नाही, असे सातारा शाखेचे म्हणणे आहे. तसेच यजमानपद साताऱ्याने नाकारले, असे नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेनेही कधी म्हटलेले नाही. ‘सातारा आणि नगरमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ठाण्याला संमेलन घेण्याचा निर्णय झाला,’ असेच मध्यवर्ती शाखेने जाहीर केल्याचे चिटणीस यांनी नमूद केले. ‘राज्य शासनाकडून मिळणाऱ्या २५ लाखांच्या निधीव्यतिरिक्त २५ लाखांचा निधी स्थानिक पातळीवर उभारला जाईल आणि काटकसरीने संमेलन आयोजित केले जाईल, अशी ग्वाही सातारा शाखेने दिली होती. ही चर्चा संमेलनाध्यक्ष निवडीच्या आधी झाली होती; त्यामुळे आम्ही विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा आग्रह धरल्याची चर्चाही चुकीची आहे,’ असे ते म्हणाले.
 

शासनाच्या अनुदानाइतकीच रक्कम आम्ही उभी करू आणि देखणे संमेलन करू, अशी आमची भूमिका होती. मात्र संमेलनांचे सध्याचे स्वरूप पाहता एवढ्या निधीत ते होणार नाही, असे वाटल्याने साताऱ्याची संधी हुकली असावी. परंतु आम्ही नकार कळविला नाही, हे नक्की.
- श्रीकांत देवधर, उपाध्यक्ष, सातारा शाखा
 

पन्नास लाखांत संमेलन करून दाखवण्याची आमची जिद्द होती आणि आम्ही ते करू शकलो असतो. पूर्वीही नाट्य संमेलनासह अनेक संमेलने येथे झाली. त्यातून पैसे वाचवून वर्षभर उपक्रम राबविले गेले. परंतु यासाठी संमेलनातील झगमगाटाला फाटा देणे आवश्यक असते.
- प्रा. शेखर कुलकर्णी, खजिनदार, सातारा शाखा
 

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संमेलनासाठी स्थानिक पातळीवर निधी संकलनाला मर्यादा येणार, हे निश्चित होते; परंतु पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून, अनावश्यक खर्चाला फाटा देऊन एक उत्तम संमेलन आयोजित करण्याची आमची संधी हुकली, याचे वैषम्य वाटते.
- राजेश मोरे, कार्यवाह, सातारा शाखा

Web Title: We did not reject the Natya Sammelan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.