हमरस्ता नव्हे... शेतातली पायवाट !
By Admin | Updated: September 11, 2014 23:01 IST2014-09-11T22:14:44+5:302014-09-11T23:01:37+5:30
रांजणीपाटी-पळशी रस्त्याची दुरवस्था : २५ वर्षांचा वनवास संपणार कधी? ग्रामस्थांचा सवाल

हमरस्ता नव्हे... शेतातली पायवाट !
शरद देवकुळे - पळशी -माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील खडी उखडलेली आहे. तर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय, चालणेही अवघड झाले आहे.
वाहनचालकांनी काही ठिकाणी मोकळ्या शेतातूनच रहदारी चालू केली आहे. परिणामी, शेतकरी व वाहनचालक यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे असून आता तरी हा वनवास संपनार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून केला जात आहे.
पळशी-रांजणीपाटी हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, रांजणीपाटी येथे शिंगणापूर-म्हसवड या मुख्य रस्त्याला जोडलेला आहे. हाच रस्ता पुढे रांजणी गावाला जातो. परिसरातील माळीखोरा, माळेवस्ती, बिडवेवस्ती, काळेवस्ती येथील ग्रामस्थ नेहमीच पळशीला कामानिमित्त तसेच रेशनिंगसाठी व आठवडी बाजारासाठी नेहमीच ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे या परिसरासह रांजणी, भालवडी, पुजारमळा येथून दर पौर्णिमेला गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात. गोंदवले येथे जाण्यासाठी हाच नजीकचा मार्ग असून, रस्त्याची दुर्दशा झाल्याने भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पळशी येथे शिक्षणासाठी विद्यार्थी याच रस्त्याने जात असतात. विद्यार्थ्यांनाही दररोज याच रस्त्याच्या जाचातूनच जावे लागत आहे. तरी संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.