सातारा - पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाचे ढग जमू लागल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माजी नौदल सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी पुन्हा हाती शस्त्रे घेण्याची तयारी ठेवली आहे. केंद्र सरकारने आवाहन केल्यास आम्ही कोणत्याही आवाहनासाठी सज्ज असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संरक्षणमंत्र्यांना दिले आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्याला सरसेनपती हंबीरराव मोहिते ते दिवंगत कर्नल संतोष महाडिकपर्यंतचा लष्करी वारसा आहे. जिल्ह्यातील सैनिकांनी दोन्ही जागतिक महायुद्धांमध्ये तसेच स्वातंत्र्योत्तर युद्धात सहभाग घेतला आहे. या जिल्ह्यात अधिकारी, सैनिक, खलाशी आणि एअरमन आहेत. पहलगामच्या भ्याड हल्ल्यामुळे सध्या असलेली परिस्थिती आम्हाला माहीत आहे. त्यामुळे सरकारने दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवण्याचा निर्णय घेतला, तर जिल्ह्यातील ५०० आणि देशातील इतर भागातील आमचे माजी नौसैनिक भारतीय नौदलाला मदत करण्यास उत्सुक आहेत. वयामुळे मर्यादा असल्या तरी आमचा अनुभव युद्ध आघाडीवर मदत करेल. सरकार किंवा भारतीय नोदलाच्या कोणत्याही आवाहनासाठी सज्ज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.