दोन किलोमीटरमध्ये प्रत्येक झाडावर पक्ष्यांसाठी जलपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST2021-03-22T04:34:56+5:302021-03-22T04:34:56+5:30
तळमावले : उन्हाळ्यात अनेक पक्ष्यांचे अन्न, पाण्याविना हाल होतात. पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यावर उपाय म्हणून पाटण तालुक्यातील ...

दोन किलोमीटरमध्ये प्रत्येक झाडावर पक्ष्यांसाठी जलपात्र
तळमावले : उन्हाळ्यात अनेक पक्ष्यांचे अन्न, पाण्याविना हाल होतात. पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यावर उपाय म्हणून पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील धरणीमता फाऊंडेशनकडून पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी जलपात्र आणि खाण्यासाठी अन्नपात्र तयार करण्यात आले आहे. सुमारे दोन किलोमीटर परिसरात वेगवेगळ्या झाडांवर ती ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये दररोज पाणी आणि खाण्यासाठी बाजरी, गहू, तांदूळ, मका, ज्वारी असे विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते.
सध्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि वातावरणातील आमूलाग्र बदलामुळे उन्हाळा हा अतिशय तीव्रतेने जाणवू लागला आहे. याच्या झळा जशा माणसाला बसत आहेत त्याचप्रमाणे वन्य जीवांनाही जाणवत आहेत. पक्षी हा निसर्ग रचनेतील एक अविभाज्य आणि मूलभूत घटक आहे. निसर्ग साखळी अभेद्य राहण्यासाठी पक्षी, कीटक यांचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे असते. कारण सर्वात जास्त वृक्षारोपणाचे आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे काम पक्षीच करतात. मात्र, सध्या मानवी चुकांमुळे आणि अतिक्रमणांमुळे पक्षी नामशेष होतील की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे. माणसाने पक्ष्यांचा जास्तीत जास्त वावर असलेले पाणवठे तसेच नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून पक्ष्यांची ही भटकंती थांबविण्यासाठी कुंभारगावातील धरणीमाता फाऊंडेशन सरसावले आहे.
पक्ष्यांची पाणी आणि अन्नासाठी उन्हाळ्यात होणारी भटकंती थांबावी, यासाठी फाऊंडेशनने जलपात्र आणि अन्नपात्र तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ही पात्र तयारही करण्यात आली. त्यानंतर कुंभारगाव परिसरातील सुमारे दोन किलोमीटर अंतरातील वेगवेगळ्या झाडांवर ही पात्र ठेवण्यात आली. त्या पात्रांमध्ये अन्न आणि पाणी ठेवण्याची जबाबदारी फाऊंडेशनच्या प्रत्येक सदस्याने स्वीकारली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हा उपक्रम राबविण्याचा संकल्प फाऊंडेशनने केला आहे.
- चौकट
पाखरांचा चिवचिवाट वाढला
एरव्ही गावानजीकच्या झाडांवर पक्ष्यांचे क्वचित दर्शन व्हायचे. पक्षी अन्न आणि पाण्याच्या शोधात इतरत्र भटकत रहायचे. मात्र, सध्या धरणीमाता फाऊंडेशनने गावानजीक दोन किलोमीटर परिसरातील झाडांवर जलपात्र आणि अन्नपात्र ठेवल्यामुळे या झाडांवर पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहेत. या पक्ष्यांच्या चिवचिवाटाने परिसर बहरून जात आहे.
- कोट
धरणीमाता फाउंडेशन स्थापन करण्यामागे ‘वन्य जीव वाचवूया, निसर्गावर प्रेम करूया’ हा उद्देश आहे. उद्देशाप्रमाणेच फाऊंडेशनचे कार्य सुरू आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांचे होणारे हाल पाहवत नाहीत. त्यामुळे त्यांचे कष्ट कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गावोगावी अशी चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे.
- सतीश वाघ
अध्यक्ष, धरणीमाता फाऊंडेशन
फोटो : २१केआरडी०१
कॅप्शन : कुंभारगाव, ता. पाटण येथील धरणीमाता फाऊंडेशनच्यावतीने पक्ष्यांसाठी जलपात्र व अन्नपात्र तयार करण्यात आली असून ती वेगवेगळ्या झाडांवर ठेवण्यात आली आहेत.