उत्तर कोरेगावात रंगलंंय पाण्याचं राजकारण
By Admin | Updated: July 31, 2014 23:29 IST2014-07-31T21:02:28+5:302014-07-31T23:29:32+5:30
वाठार स्टेशन : तात्पुरत्या नव्हे कायमस्वरूपी पाण्याची गरज

उत्तर कोरेगावात रंगलंंय पाण्याचं राजकारण
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील २६ गावांत येणाऱ्या विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर समोर ठेवत या गावात मोफत पाणी टँकर, आरोग्य शिबिर घेऊन मतदारांना खुष करण्याचा सपाटा लावला आहे.
मात्र, कायम दुष्काळी असलेल्या या भागाचा ‘कायम’ शब्द खोडण्यासाठी तात्पुरत्या टँकरची नव्हे तर कायमस्वरुपी पाण्याची गरज असल्याची भावना लोक व्यक्त करीत आहेत.जिल्ह्यात जरी समाधानकारक पाऊस होत असला तरी कोरेगाव तालुक्याच्या या भागात अजून ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. लोकसभेला माढा, विधानसभेला फलटण तर इतर निवडणुकांसाठी कोरेगाव अशी तळ्यात-मळ्यात भूमिका असलेल्या या भागात अजून ५० टक्के पेक्षाही कमी पाऊस झाला आहे. या भागाची वरदायिनी असलेली वसना आजही कोरडी आहे. तर नांदवळ, तळहिरा हे प्रमुख तलावही कोरडेच आहेत. त्यामुळे पाणीटंचाई, दुष्काळाचे संकट आजही या भागात कायमच आहे. अगदी या दुष्काळी गावांची हीच नस ओळखून सध्या या गावासाठी काहीजणांनी पाण्याचे टँकर सुरू केले आहेत.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना; पण दुष्काळी भागात आता मोफत पाण्याचा सुकाळ आहे, अशीच परिस्थिती सध्या तरी दिसतआहे. दुष्काळाबाबत ‘नाव मोठं, लक्षण खोटं,’ अशी भावना या भागातील मतदार ग्रामस्थांतून व्यक्त होत असून, निवडणुकीत खुद्द शरद पवारांच्याच मतदारसंघात असल्याने उत्तर कोरेगावची बारामती होणार ही आशा धुळीला मिळाली आहे. त्यामुळेच लोकसभेला या दुष्काळी भागानं बारामतीकरांनाही पाणी पाजलं.आता विधानसभेच्या तोंडावर मोफत पाणी टँकर देऊन मत मिळतील का? या प्रश्नाचं उत्तरही येणाऱ्या विधानसभा निवडकुणीतच मिळणार आहे. (प्रतिनिधी)