महू-हातगेघरचे पाणी ‘कुडाळी’त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:53 IST2016-04-26T23:38:01+5:302016-04-27T00:53:43+5:30
प्रस्तावाला मंजुरी : कुडाळ गावच्या मागणीनंतर पाणी आल्याने आनंदाचे वातावरण

महू-हातगेघरचे पाणी ‘कुडाळी’त
सातारा : कुडाळ, शेते, कळंबे, सर्जापूर, उडतारे या गावांची वरदायिनी असणारी कुडाळी नदी सद्य:स्थितीत पूर्णपणे आटलेली आहे. नदी आटल्याने या गावांच्या पाणी योजना अडचणीत आल्या असून, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. कुडाळमध्ये बुधवार-गुरुवारी यात्रा असून, महू-हातगेघरचे पाणी नदीत सोडल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावळीचे तहसीलदार रणजित देसाई यांनी महू-हातगेघर धरणातील पाणी सोडण्याचे आदेश व्हावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता, हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पाटबंधारे खात्याकडे पाठविला असून, त्यांच्याकडचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. यात्रेला अवघा एक दिवस राहिला असल्याने कुडाळ ग्रामस्थांमध्ये चिंतेचे तसेच संतापाचे वातावरण आहे.
जावळी तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असणाऱ्या कुडाळात ग्रामदैवत वाकडेश्वराची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते.
कुडाळी नदी कोरडीठाक पडल्याने या नदीलगत असणाऱ्या पाणी योजना बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतीसाठीही पाणी उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
महू-हातगेघर धरणातील पाणी कुडाळी नदीत सोडल्यास कुडाळ, कळंबे, सर्जापूर, उडतारे येथील पाणी योजनांना दिलासा मिळणार आहे.
तहसीलदार रणजित देसाई यांनी दिलेल्या प्रस्तावामुळे या चारही गावांमध्ये उत्साह आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी यावर निर्णय घेण्याची शक्यता असून, यात्रेपूर्वी कुडाळी नदीत पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यामुळे पाच ते सहा गावांतील लोक आनंदित आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. (प्रतिनिधी)