सव्वा तपापासून जलवाहिनीला गळती
By Admin | Updated: August 13, 2015 22:45 IST2015-08-13T22:45:29+5:302015-08-13T22:45:29+5:30
विद्यानगर वसाहत : दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप

सव्वा तपापासून जलवाहिनीला गळती
सातारा : शहरात अनेक आंदोलने हे पाण्यासाठी होतात. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक कारणांना संबंधित विभागाला तोंड द्यावे लागते; परंतु येथील औद्योगिक वसाहतीमध्ये याला अपवादात्मक गोष्ट म्हणजे येथील पाण्याच्या टाकीला पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला एक-दोन नव्हे, तर तब्बल १५ वर्षांहून अधिक काळापासून गळती लागली आहे. या गळतीमुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांमधून बोलले जात आहे. कोडोली येथील गणेश चौकाजवळील विद्यानगर वसाहतीतून औद्योगिक वसाहतीच्या जलटाकीत पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला ही गळती लागली आहे. ही जलवाहिनी जवळपास अडीच फूट व्यासाची असून, विद्यानगर येथील वसाहतीमध्ये या वाहिनीला दोन ठिकाणी वळविण्यात आल्याने येथे सतत पाण्याचा दाब असतो. त्यामुळे येथे नेहमी गळती लागलेली असते. ज्या ठिकाणी ही गळती लागली आहे, त्या ठिकाणी मोठे डबके झाले असून, शेजारहून सांडपाण्याचा नालाही या डबक्यातूनच जात आहे. त्यामुळे जलवाहिनीचे पाणी अन् सांडपाणी एकत्र मिसळत असून, हेच पाणी येथील वाहणाऱ्या ओढ्यात जात आहे. या जलवाहिनीला चोवीस तास पाणीपुरवठा होत असल्याने प्राधिकरणाचे लाखो लिटर पाणी येथून वाया जात आहे. हे सर्व पाणी ओढ्यात जात असल्याने प्राधिकरणाचे लाखो रुपये पाण्यात जात असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.दरम्यान, जलवाहिनी सांडपाणी वाहणाऱ्या गटारीला चिटकून आहे. सांडपाणी व गळती लागलेल्या जलवाहिनीतील पाणी मिश्रित होत असून, येथील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी प्राधिकरणाला कळवून देखील प्राधिकरण तात्पुरती मलमपट्टी करून जातात व पुन्हा दोन दिवसांनी जलवाहिनीला गळती लागते. पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्याने ही मलमपट्टी टिकत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.जलवाहिनीला ज्या ठिकाणी गळती लागली आहे, त्या ठिकाणी पडलेल्या डबक्यात मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक गोंधळ घालत आहेत. धुणे, भांडी, अंघोळीसुद्धा या ठिकाणी होत असून, जणू काही या ठिकाणी धोबीघाटच आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली असून, काही विघ्नसंतोषी नागरिकच या जलवाहिनीला फोडत आहे, असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष
पाण्याची होणारी गळती थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न करणारी जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांना १५ वर्षांहून अधिक काळ झाला. या जलवाहिनीची गळती काढता आली नाही. दिवसरात्र पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीलाच गळती लागली असल्याने प्राधिकरणाचे या १५ वर्षांत किती नुकसान झाले याचा अंदाजसुद्धा लावता येणार नसल्याचे नागरीक सांगतात..
पाण्याच्या
दाबाने गळती
जीवन प्राधिकरणाच्या या जलवाहिनीला प्रचंड पाण्याचा दाब असून या परिसरातल्या पाईपला दोन बेंड आहेत. त्यामुळे ही जलवाहिनी सतत फुटत आहे. रात्रं दिवस पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने त्याची तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
- राजेंद्र यादव