पाणीसाठ्यात जमिनी बुडाल्या...

By Admin | Updated: November 13, 2015 23:44 IST2015-11-13T21:48:42+5:302015-11-13T23:44:10+5:30

मोरणा-गुरेघर प्रकल्प : आंबेघर तर्फ मरळीच्या ग्रामस्थांची ओरड; १४ रोजी आमदार अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी

Water for land | पाणीसाठ्यात जमिनी बुडाल्या...

पाणीसाठ्यात जमिनी बुडाल्या...

पाटण : सुमारे दीड टीएमसी पाणीसाठा क्षमतेचा मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्प सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याने तुडुंब भरला आहे. मात्र, कृष्णा खोरेचे अधिकारी व कालव्यांचे ठेकेदार यांच्या ढिसाळ कारभारांमुळे या धरणातील पाणी, कालव्याची कामे अर्धवट राहिल्यामुळे शेतीला अद्याप मिळालेले नाही. दुसरीकडे धरण पूर्णक्षमतेने भरल्यामुळे पाणलोट क्षेत्राच्या आसपास असलेल्या शेतजमिनीमध्ये पाणी शिरले आहे. याबाबत आंबेघर तर्फ मरळीचे ग्रामस्थ ओडत करत असून, धरणातील पाणीसाठ्याचे कसलेही नियोजन केले नसल्यामुळे प्रकल्प असून खोळंबा नसून घोटाळा, अशी अवस्था झाली आहे.
या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच खास करून धरणातील पाणीसाठा येत्या जूनपर्यंत कसा वापरावयाचा याचे नियोजन करण्यासाठी आमदार शंभूराज देसाई यांनी १४ नोव्हेंबर रोजी कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मोरणा-गुरेघर धरणाची पाहणी करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर पाटण शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहेत. मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्पाची पार्श्वभूमी पाहायचे झाल्यास उजवा आणि डावा कालवा काढून ३० किलोमीटर पर्यंतच्या गावांना व शेतीला पाणी देण्याची योजना आहे. कालव्यांची कामे आघाडी शासनाच्या काळात सुरू झाली. मात्र, ठेकेदारांनी कामात मोठा कालवा करून आर्थिक गडबड केली.
दुसरीकडे शासनस्तरावर घोटाळा बाहेर आला, त्यामुळे कालवे बंद पडले. अर्धवट कामे राहिल्यामुळे कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील सुमारे ५० गावांना पाणी तर मिळाले नाहीच; मात्र कालव्यांसाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला दिला नाही. आणि खोदकाम केल्याने शेती पडीक झाली. ठेकेदार गायब झाले. (वार्ताहर)


मासेमारी व गैरप्रकारांना वाव
मोरणा-गुरेघर प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, हा प्रकल्प अद्याप शासनाने ताब्यात घेतलेला नाही. त्यामुळे ठेकेदाराला आपली तोडी यंत्रणा प्रकल्पावरच ठेवावी लागली आहे. अशा स्थितीमुळे अवैध मासेमारी व गैरप्रकारांना वाव मिळत आहे.


मोरणा-गुरेघर प्रकल्पातील वाढीव पाणीसाठ्यामुळे पाण्याखाली गेलेल्या शेतजमिनी मोकळ्या करून मिळाव्यात. त्याबदल्यात आम्हाला नुकसानभरपाई म्हणून पैसे नकोत ते आम्ही स्वीकारणार नाही. याबाबत १४ रोजीच्या बैठकीत धरणग्रस्त आक्रमक भूमिका मांडतील.
- बशिर खोंदू, अध्यक्ष, मोरणा-गुरेघर धरणग्रस्त कृती समिती

Web Title: Water for land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.