वनसंपदा राखतायत धरणातील पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST2021-03-22T04:34:45+5:302021-03-22T04:34:45+5:30
सातारा : पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही ...

वनसंपदा राखतायत धरणातील पाणी!
सातारा : पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही बाजूंना वनाच्छादन असल्याने जमिनीची धूप झाली नाही. ही झाडे या परिसरात नसती तर प्रत्येक पावसात धरणांत माती साठून शंभर टीएसमी क्षमता असणारं धरणं गाळाने भरून गेलं असतं. हे वनांनी केलेलं सर्वांत महत्त्वाचं आणि मोठं काम असल्याचं पर्यावरणतज्ज्ञ सांगतात.
राज्यात साताऱ्याची समृद्ध ओळख ही येथील धरणं आणि त्यातील पाणी यामुळे आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकला पाणीपुरवठा करणारे मोठे कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. याबरोबरीने अन्य छोटी - मोठी धरणेही जिल्ह्याचा पिण्याचा, सिंचनाचा आणि वीजनिर्मितीचा भार उचलत आहेत. पावसाचं पाणी धरणांपर्यंत जाण्यापूर्वी ते वनक्षेत्रातून जाते. वनक्षेत्रातून गाळून आलेलं पाणी धरणात साठत असल्यामुळे वाहून आलेल्या पाण्यातून मातीचा अंश फारसा आढळत नाही. परिणामी धरणांमध्ये गाळ साठण्याचं प्रमाण कमी असून त्याचं श्रेय धरण परिसरातील वनक्षेत्राला जाते.
जिल्ह्याच्या वनक्षेत्रांत वाघाटी, चिंच, उंबर, बाेरे, सीताफळ, रामफळ, भोकर, जांभूळ, करवंद ही फळं तर हेरडा, बेहडा, ऐन, किंजळ, नाना, शेर, अंजनी, डाका, पुमा अशा वनौषधीही येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सदा हरित, शुष्क भागासह निमसदाहरित भागही वनक्षेत्रांमध्ये आढळून येतो. इतकी वैविधतापूर्ण समृद्धता अन्य कुठेही आढळून येत नाही, हे विशेष.
झाड तेच रूप वेगळं!
सातारा जिल्ह्यात पठारावर आणि सपाटीला येणाऱ्या झाडांमध्ये मोठा फरक आढळतो. कास पठारावर असणारी जांभळांची झाडं ही खुजी आहेत; तर सपाटीवर येणारी झाडं उंच आहेत. पठारावर असणाऱ्या झाडांना ऊन आणि पाऊस याबरोबरच वाऱ्याचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांची उंची कमीच राहाते. याउलट डोंगराच्या आडून येणाऱ्या वाऱ्याचा फारसा वेग सपाटीच्या झाडांना लागत नसल्यामुळे तिथली झाडं उंच होतात.
कोट :
आपल्याकडे वनक्षेत्रात मुबलक प्रमाणात वनौषधी आणि वनउपज असलेली फळझाडंही आहेत. वनांमध्ये मुबलक असणाऱ्या या समृद्धीचा उपयोग अद्याप आपल्याकडे होताना आढळत नाही. यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे.
- सुनील भोईटे, पर्यावरण अभ्यासक