मनोरंजनाच्या पैशातून जलसंधारणाची कामे
By Admin | Updated: April 11, 2016 00:51 IST2016-04-10T22:21:03+5:302016-04-11T00:51:32+5:30
म्हावशी गावाचा निर्णय : यात्रेतील तमाशा, कुस्त्यांचा आखाडा यंदा रद्द

मनोरंजनाच्या पैशातून जलसंधारणाची कामे
खंडाळा : खंडाळा तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावोगावी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी म्हावशी, ता. खंडाळा येथील ग्रामस्थांनी यात्रेतील मनोरंजनाचे कार्यक्रम
न घेता त्या पैशातून जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हावशी येथे ग्रामदैवत बाळसिद्धनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. देवाच्या धार्मिक विधीबरोबरच पालखी छबिना, लोकनाट्य तमाशा, कुस्त्यांचा आखाडा असे विविध कार्यक्रम घेतले जातात. यावर लाखो रुपये खर्च होत असतात.
यावर्षी सर्वत्रच दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत गावच्या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे होणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन ग्रामस्थ व
यात्रा समितीने नियोजन बैठकीत यात्रेत तमाशा व कुस्त्यांचा आखाडा न भरविण्याचा निर्णय घेतला.
मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी होणारा एक ते दीड लाख रुपयांचा खर्च वाचणार असून तो जलसंधारणाच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. यातून ठिकठिकाणी सिमेंट बंधारे, ओढ्याची खोली वाढविणे, अशी कामे करून पाणीसाठा वाढविण्याचा प्रयत्न होणार आहे.
दुष्काळात उपयुक्त पाणीसाठ्याचा वापर कसा करावा, गावची पाण्याची गरज भागविण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता गावाने मिळून जलसंधारणासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, याचे उदाहरण म्हावशी गावाने घालून दिले आहे. (प्रतिनिधी)
नोकरदारांच्या एकीतून परिवर्तन
म्हावशी गावात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. गावच्या या निर्णयात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. गावातील सर्व नोकरदारांनी प्रत्येक एक हजार रुपये निधी गोळा करून तो जलसंधारणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थ व नोकरदारांचा निधी मिळून मोठे काम मार्गी लागणार आहे.