सेवाभावी संस्थांना जलसंवर्धनाचा ध्यास
By Admin | Updated: May 25, 2016 23:25 IST2016-05-25T22:22:15+5:302016-05-25T23:25:45+5:30
भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न : पसरणी घाटात श्रमदानातून ठिकठिकाणी बांधले बंधारे - लोकमत जलमित्र अभियान

सेवाभावी संस्थांना जलसंवर्धनाचा ध्यास
वाई : सध्या राज्यात पडलेला भीषण दुष्काळ व त्याची वाढत चाललेली भीषणता लक्षात घेऊन ‘लोकमत’ने जलसाक्षरतेबाबत सुरू केलेल्या जलमित्र अभियानास सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जमिनीत पाणी असेल तर ते लोकांना पिता येईल, यासाठी वाईतील काही संस्थांनी पाणी अडवा, पाणी जिरवा, हा उपक्रम हाती घेतला आहे.
पाणी संवर्धन करणे ही काळाची गरज व ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थांनी ‘आपले पाणी आपल्या रानी’ या उपक्रमांतर्गत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे काम हाती घेऊन संपूर्ण घाटात नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या ठिकाणी दगडी बंधारे बांधले आहेत. या माध्यमातून पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये पतंजली योग समिती, सुयश प्रतिष्ठान, समूह संस्था, भगवा कट्टा प्रतिष्ठान या संस्थांनी पुढाकार घेतला. त्याला वाईतील इतर संघटना व स्थानिक ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. सेवाभावी संघटनेने जवळपास पंधरा ते वीस बंधारे तयार केले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साठल्यास दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे.
वाई भागात पावसाचे प्रमाण इतर तालुक्याच्या मानाने चांगले असते. परंतु यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष या भागातही जाणवत होते. पसरणी घाटात मार्च, एप्रिलमध्येच पाणीटंचाई जाणविल्याने संपूर्ण घाटात याच संस्थांच्या माध्यमातून पशुपक्ष्यांना पाण्याची भांडी बांधण्यात आली होती. शासनाच्या मदतीशिवाय पाणी टंचाईवर उपाय म्हणून सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. शासनाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्यास त्याचा परिणाम लवकर जाणवेल. त्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे.
बंधारा बांधण्यासाठी मकरंद शेंडे, रामदास राऊत, विठ्ठल माने, भैय्या सकुंडे, धनंजय मलटणे, प्रकाश वाडकर, म्हलारी पेटकर, सचिन नवघणे, धनंजय घोडके, सुभाष यादव, यशवंत डेरे, दिलीप डोंबवलीकर, दिलीप कदम, मंदार जठार, शांताराम अंबिके, सुनंदा कट्टे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
श्रमदानाचा संकल्प
दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली असून याचे निवारण करण्यासाठी शासकीय पातळीवर व्यापक नियोजनाबरोबर लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. म्हणून वाईतील सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध गावांमध्ये प्रत्येक रविवारी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदान करण्याचा संकल्प केला आहे.