पाण्यातील जीवाणू हल्ल्यासाठी टपून...
By Admin | Updated: July 16, 2014 01:23 IST2014-07-16T01:16:40+5:302014-07-16T01:23:26+5:30
डॉक्टरांचा सल्ला : पाणी उकळून प्या; पावसाळ्यात मांसाहार शक्यतो टाळा

पाण्यातील जीवाणू हल्ल्यासाठी टपून...
सातारा : पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या माध्यमातून वाहून येणाऱ्या घाणीमुळे पाणी दूषित होते. हे पाणीच अनेक आजारांचे कारण ठरते. म्हणून पावसाळ्यात शुद्ध पाणी प्यायले तर आरोग्य ठणठणीत राहील, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ हे सर्वांनाच माहिती आहे. पण या दिवसांत नेमकं कशामुळे आजार होतात, याविषयी आपल्याकडे अजूनही फारशी जागरूकता दिसत नाही. उन्हाळ्यात विविध ठिकाणी साचलेला केरकचरा पावसाच्या पाण्याने वाहून येतो. खूप दिवस पाण्याचा शिडकावा जमिनीवर न झाल्यामुळे जमिनीवर अनेक जीवजंतू तयार झालेले असतात. हे जंतू उन्हाळ्यात चांगले पोसले जातात; पण जसा पाऊस पडायला सुरुवात होते, तसे हे जंतू त्यांच्या जन्मस्थळापासून पाण्याच्या प्रवाहात वाहून येतात. पूर्ण कोरड्या जमिनीवर राहण्याची आणि जगण्याची सवय असणाऱ्या या जीवाणूंना पाण्याचा त्रास होतो. बहुतांश जीवाणू या पाण्यात मृत होतात. त्यामुळे पाणी दूषित होते आणि त्याचा त्रास संभवतो.
पावसाळ्याच्या पहिल्या काही दिवसांत पाणी उकळून प्यायले, तर हा त्रास जाणवत नाही. ज्या घरांमध्ये छोट्या मुलांची संख्या आहे, त्यांनी घराशेजारी पाणी साठणार नाही आणि मुलं अस्वच्छ पाण्यात खेळणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)