गोदामात दवाखाना!
By Admin | Updated: July 23, 2014 22:30 IST2014-07-23T22:21:40+5:302014-07-23T22:30:49+5:30
वरकुटे-मलवडीतील प्रकार : डॉक्टरही नाहीत; वर्षानुवर्षे जनता सोसतेय हालअपेष्टा

गोदामात दवाखाना!
वरकुटे मलवडी : ‘लाकडाच्या वखारीत, माकडाचा दवाखाना... खरं म्हणा-खोटं म्हणा, तिथं येती रोगी नाना...’ असं एक जुनं बडबडगीत आता विस्मृतीत गेलंय. पण चक्क गोदामात दवाखाना बघून जुन्या मंडळींना या गीताची आठवण नक्की ताजी होईल. माण तालुक्यातल्या वरकुटे-मलवडी गावात सरकारी आयुर्वेदिक दवाखाना चक्क सोसायटीच्या गोदामात सुरू असून, तेथील दुरवस्थेमुळं वर्षानुवर्षे सर्वसामान्य रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.
वरकुटे-मलवडी येथे गेले साडीतीन वर्षे हा कारभार सुरू आहे. शासकीय योजनेतून आरोग्यसेवेसाठी ४३ लाख रुपये गेल्या चार वर्षांत मंजूर झाले आहेत. फक्त जागा उपलब्ध नाही, या कारणास्तव दिवसेंदिवस नेत्यांनी चालढकल सुरू ठेवली आहे. दुसरीकडे, गावठाणाची अनेक ठिकाणची जमीन अतिक्रमण करणाऱ्यांनी बळकावली आहे. त्यामुळे वरकुटे-मलवडी भागातील सर्वसामान्य जनता हालअपेष्टा भोगत आहे. गरोदर माता आणि गोरगरीब महिलांना उपचारांसाठी पुळकोटी येथील दवाखान्यात जावं लागतंय. याखेरीज किरकोळ आजारांसाठी गरीब जनतेला खासगी दवाखान्यांत जादा पैसे देऊन उपचार करणं भाग पडतंय. रात्री-अपरात्री साप चावलेल्या अनेक रुग्णांना खासगी वाहन भाड्याने घेऊन म्हसवड किंवा सातारा येथे घेऊन जाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
सध्या गोदामात सुरू असलेल्या दवाखान्यात गेल्या दीड वर्षापासून डॉक्टरच नाही. येथील गरोदर मातांना लहान-लहान बाळांना घेऊन गोदामातील दवाखान्यात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पायऱ्या नसल्यामुळं चार फूट उंच चढून कसाबसा दवाखान्यात प्रवेश करावा लागत आहे.
येथील सर्व कारभार आरोग्यसेविका कसाबसा सांभाळतात. लस देण्यासाठी अनेकदा दूरवरील वस्त्यांमधून लहान बाळांना घेऊन अनेक माता येतात; मात्र नर्सबाई नाहीत म्हणून त्यांना ताटकळावं लागतं. या परिस्थितीकडे नेतेमंडळींनी कानाडोळा केला आहे.
वरकुटे-मलवडी परिसरातील वाड्या-वस्त्या विचारात घेता जवळजवळ पाच ते साडेपाच हजार लोकसंख्येच्या या गावात वैद्यकीय सेवेची अशी तऱ्हा आहे. दोन-तीन किलोमीटरवरून महिला लहान बाळांना डोस पाजण्यासाठी घेऊन येतात. परंतु काही वेळा हा डोससुद्धा वेळेवर मिळत नाही.
राजकीय वरदहस्त लाभलेल्या माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी गावातील गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, अपंग व्यक्ती, वयोवृद्ध आणि सर्पदंश झालेल्या व्यक्ती यांची मात्र अशा प्रकारच्या आरोग्य सेवेमुळे भलतीच तारांबळ उडत आहे. (वार्ताहर)
-गावात विविध शासकीय योजनांतर्गत वेळोवेळी निधी येत असतो. मात्र, अनेकदा निधी खर्च होत नाही. शिवाय, गटातटाचे राजकारण गावात जोरात असून, गावाला अनेक राजकीय पदे लाभली आहेत. त्या पदांचा उपयोग गावाच्या कल्याणासाठी होण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी आणि चिखलफेक करण्यासाठीच होत असून, विकासकामे ठप्प झाली आहेत, असे ग्रामस्थांचे मत आहे. ग्रामस्थांना राजकारण नको, तर विकास पाहिजे. लोकांच्या अडचणी समजावून घेणारे कोणी नसेल तर इतक्या राजकीय पदांचा उपयोग काय, अशी चर्चा गावात सुरू आहे.
गेले अनेक दिवस गावातील गोरगरीब जनता गावात सरकारी डॉक्टर नसल्यामुळे हाल सोसत आहे. या हालअपेष्टा आता तरी थांबल्या पाहिजेत. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गावात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि गावातील कर्त्या मंडळींनी दवाखान्याला गावठाणमधील जागा उपलब्ध करून द्यावी.
संजय चव्हाण,
ग्रामस्थ, वरकुटे-मलवडी
गावातील दवाखान्यात डॉक्टर नसल्यामुळे अनेक भगिनींना असहायपणे यातना सहन कराव्या लागत आहेत. आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात. लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून समाजकारण केले पाहिजे.
- रवींद्र आटपाडकर, ग्रामस्वच्छता पाणीपुरवठा सदस्य, वरकुटे-मलवडी