विकासाच्या मार्गावर दारूचा घमघमाट !
By Admin | Updated: April 11, 2016 00:49 IST2016-04-10T22:23:27+5:302016-04-11T00:49:04+5:30
मटका बहाद्दरांचाही धुमाकूळ : रस्त्यापेक्षा गटाराची उंची वाढल्याने दूषित पाणी रस्त्यावर; पार्किंगचा प्रश्न बनलाय गंभीर

विकासाच्या मार्गावर दारूचा घमघमाट !
सातारा : नगराध्यक्षांचा प्रभाग म्हणून ओळखला जात असलेल्या प्रभाग सातलाही असंख्य समस्यांनी ग्रासले आहे. रस्ते झाले आहेत तर गटारींची सोय नाही. रस्त्यापेक्षा गटाराची उंची जास्त असल्याने रस्त्यावर पाणी येते. पावसाळ्यात उड्या मारुन घरात जावे लागते. तर काही ठिकाणी अजिंक्यतारा किल्ल्यावरुन येणारे पाणी थेट घरात शिरते. नकाशपुरा भागातील वेगळीच समस्या आहे. मटका, दारू दुकानांनी सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवली आहे, अशी धक्कादायक माहिती ‘लोकमत आपल्या प्रभागात’च्या टीम ला मिळाली.
शेटे चौकापासून सुरू होणाऱ्या या प्रभागात शनिवार चौकाच्या उत्तरेकडील नकाशपुऱ्याचा भाग, मल्हार पेठ, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, शहर पोलिस ठाणे, पोलिस वसाहती, करमणूक केंद्र, पोलिस तळे, नगरपालिका चौक, कैकाडी वस्ती, लोणार वस्ती, सर्वोदय कॉलनी, शहर वाहतूक शाखेचे कार्यालय अशा परिसराचा समावेश आहे.
या प्रभागाचा विस्तार इंग्रजी ‘एस’ आकारात झाला आहे. शहराचे नाक असलेल्या पोवईनाका परिसरातील लोणार गल्लीचा यात समावेश होतो. पोवईनाक्यापासून पालिकेपर्यंत चौपदरी रस्ता असला तरी या रस्त्याला लोणारगल्लीतून समांतर रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वर्दळ वाढत आहे. शाळा-महाविद्यालय आहेत. मात्र सुविधांच्या गैरसोयीमुळे समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सयाजीराव महाराज विद्यालय, विधी महाविद्यालय, महात्मा फुले अध्यापक विद्यालय, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, जिजामाता अध्यापक विद्यालय सुटते तेव्हा विद्यार्थ्यांची रस्त्यावर मोठी गर्दी असते. त्याचवेळी वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करावा, अशी अनेक वर्षांपासून मागणी जोर धरत आहे. ती अद्यापही कायम आहे. पोवईनाका परिसरात महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे परिसरातील महिलांची मोठी कुचंबणा होत असते.
शहरातील वाढत्या वाहनांच्या तुलनेत या प्रभागात वाहनतळाची सोय नाही. त्यामुळे लोकांना रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करावी लागतात. अनेकदा दुतर्फा वाहने उभी असल्याने रस्त्याची कोंडी होते.
लोणार गल्ली, पोलिस वाहतूक शाखा परिसरात चांगले रस्ते झाले आहे. मात्र, पालिकेची निवडणूक समोर आल्याने कार्यकर्त्यांना जपण्यासाठी नव्याने नळ जोडणी देण्यासाठी रस्त्याची फोडाफोडी सुरू केली आहे. सर्वोदय कॉलनीतील तीव्र उतारामुळे पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर माती वाहून येते. या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
शनिवार चौकाच्या उत्तरेकडील नकाशपुऱ्याचा भाग, मल्हार पेठेत बहुजन समाज वास्तव्यास आहे. नगराध्यक्ष विजय बडेकर हे यांचे नेतृत्त्व करत आहे. बडेकर यांच्याकडून येथील नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण झाल्या नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही भागात केवळ अर्धा तास पाणी पुरवठा केला जातो.
नकाशपुरा परिसरात सात ठिकाणी मटक्याचे अड्डे आहेत. तर दोन दारू दुकाने आहेत. यामुळे येथील तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे. हे रोखण्यासाठी काही तरुण प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुन ते बंद करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. परंतु, अद्याप यश आले नाही.
या प्रभागातील परिसर कोणताही असो घंटागाडीबाबत एकच समस्या आहे. घंटागाडीला थांबायला वेळच नसतो. गाड्या पुढे अन् कचरा घेऊन महिला मागे धावत असतात. वारंवार विनंत्या करुनही ‘कचरा मॅरेथॉन’ काही थांबलेली नाही. (लोकमत चमू)
एकाच दुकानावर कारवाई कुटुंब उघड्यावर
रविवार पेठेतील अनिता हंबीर मोहिते यांचे सयाजीराव महाराजा विद्यालयासमोर १९८० पासून स्टेशनरीचे दुकान होते. या जागेचा ते नगरपालिकेत रितसर करही भरत होते. असे असताना पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कारवाई करुन केवळ मोहिते यांचे दुकान २०१३ मध्ये पाडले. त्याच ठिकाणी असलेली इतर दुकाने मात्र आजही सहिसलामत आहेत. या कारवाईत मोहिते कुटुंबालाच लक्ष्य केल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. दुकान उद्ध्वस्त केल्याचा मानसिक धक्का हंबीर मोहिते यांना बसला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न अनिता मोहिते यांच्यासमोर आहे. या दुकानासाठी जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष यांच्याकडे पाठपुरावा करुन न्याय मागितला आहे, तरीही दखल घेतली गेलेली नाही.
गटाराची बनली कचराकुंडी
कुंभारवाड्यासमोर मुख्य गटाराशेजारी बांधलेले गटार डोकेदुखी ठरत आहे. या गटाराचा वापर कचरा टाकण्यासाठीच वापर होत आहे. शिवाय चारचाकी, दुचाकी या गटारात अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शालेय विद्यार्थी गटारात पडून जखमी होत आहे. पालिकेने हे गटार मुजवून टाकावे.
लोणार गल्लीत तीव्र उताराचा भाग आहे. मात्र, या रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बनविले आहेत, असा आरोप दीपक क्षीरसागर यांनी केला आहे.