बिचारी गावातून फिरती... कोरोना घेऊन यायची..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST2021-04-25T04:38:07+5:302021-04-25T04:38:07+5:30

कोरोना शिरकाव झाल्यापासून तळागाळात काम केवळ आशा वर्कर्स करत आहेत. घरोघरी जाऊन ग्रामस्थांचा सर्व्हे करतात. कोणाला सर्दी, खोकला, ताप ...

Walking through the poor village ... used to bring Corona ..! | बिचारी गावातून फिरती... कोरोना घेऊन यायची..!

बिचारी गावातून फिरती... कोरोना घेऊन यायची..!

कोरोना शिरकाव झाल्यापासून तळागाळात काम केवळ आशा वर्कर्स करत आहेत. घरोघरी जाऊन ग्रामस्थांचा सर्व्हे करतात. कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का, याची माहिती संकलित करत असत. तसेच कोरोनाबाधित गावातून कोणी आलेले आहेत का? याची माहिती त्यांना ठेवावी लागत. यातून कोरोना संशयित व्यक्ती वाटली तर ती माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यावी लागते. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून फोन करून पाठपुरवा घेतला जातो. मात्र विलगीकरणात ठेवले जाईल या भीतीने अनेक ठिकाणी आशांवर गावकऱ्यांनी राग काढल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामस्थ खरी माहिती दडवत असतात.

एका गावात कोरोनाबाधित क्षेत्रातून एक मुलगा आला होता. त्याच्या हातावर शिक्का मारलेला होता. तरीही तो गावातून फिरत होता. यामुळे शेजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. पण कोण बोलणार, वाईट कोणी व्हायचं म्हणून आशा स्वयंसेविकेला माहिती देण्यात आली. साहजिकच याबाबत त्या संबंधित घरी गेल्या असता तेथील महिलांनी ‘आशा’लाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. असे अनुभव सर्वच आशांना कमी-अधिक प्रमाणात आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकारी, दक्षता समितीचे पदाधिकारी चांगले असते तर ते पाठीशी राहतात. मात्र बहुतांश वेळेला उपेक्षाच पदरात पडली आहे.

चौकट :

घराकडेही कोणी फिरकत नाही

आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन काम करतात. त्यांच्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल, या भीतीमुळे गावातील लोक त्यांच्या घराकडेही फिरकत नाहीत. तर जास्त सदस्य असलेल्या आशांच्या घरातूनही त्यांचा तिरस्कार केला जात होता. अनेकांना सर्वांसोबत जेवण न देणे, मिसळू न देणे असे प्रकार घडले आहेत.

कोट :

कोरोना महामारी आली आहे. कोरोनापासून समाजाला वाचविण्यासाठी आम्ही जनजागृती करतो. अनेकदा वाईट अनुभव आले; पण दक्षता समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी कायम सोबत राहिले.

- संगीता दरेकर,

आशा स्वयंसेविका, खटाव.

जबाबदारी

३४२ घरे

१,३५० लोकसंख्या

काय बाय यांना पडलंय...

एक आशा वर्कर दररोज २५ ते ३० घरी भेटी देते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांना त्याच घरी जावे लागतेे. अशा वेळी घरात कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का विचारावे लागते. पण सतत घरी जाणे, तेच प्रश्न विचारल्याने ग्रामस्थ चिडतात. ‘काय बाय यांना पडलंय..’ म्हणून चिडचिड केली जाते.

फोटो मेल केला आहे.

- जगदीश कोष्टी

Web Title: Walking through the poor village ... used to bring Corona ..!