नवीन प्रांतासाठी वाईकरांना करावी लागणार प्रतीक्षा
By Admin | Updated: July 29, 2014 23:02 IST2014-07-29T21:27:05+5:302014-07-29T23:02:00+5:30
तहसीलदारही नवीन येणार : विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान

नवीन प्रांतासाठी वाईकरांना करावी लागणार प्रतीक्षा
सातारा / वाई : वाईचे प्रांताधिकारी सूरज वाघमारे यांची बदली झाली आहे. परिणामी वाईकरांना विविध दाखले मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, वाईकरांना विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन प्रांताधिकारी मिळणार आहे. त्यामुळे वाईकरांना आणखी एक महिनाभर तरी नवीन प्रांताची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे तहसीलदारही नवीन येणार आहेत.
सातारा जिल्ह्यात यापूर्वी फक्त वाई, फलटण, कऱ्हाड, सातारा हे चारच उपविभाग होते. मात्र, यानंतर जिल्ह्यात कोरेगाव, कऱ्हाड, पाटण, वाई, माण आणि सातारा असे उपविभाग झाले. यानंतर काही प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तर काहींच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. यास आता वर्ष उलटून गेले. त्यानंतर प्रत्येक विभागाला नवीन प्रांताधिकारी आले. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाईचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची बदली अपेक्षितच होती. पहिली बदली प्रांताधिकाऱ्यांची झाली आहे. आता तहसीलदारांची बदली होणार आहे. मात्र, महिना झाले तरी नवीन प्रांताधिकारी वाईला मिळाली नसल्यामुळे वाई, महाबळेश्वर तालुक्यातील अनेकांची कामे खोळंबली आहेत.वाई उपविभागात वाई आणि महाबळेश्वर तालुक्याचा समावेश आहे. दोन्ही तालुक्याचा बहुतांशी भाग डोंगराळ आहे. मुख्यालय वाई असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला वाई येथेच यावे लागते. त्यातच अजूनही काही जुन्या कागदपत्रांसाठी खंडाळा तालुक्यातील लोकांना वाई प्रांताधिकारी कार्यालयातच यावे लागते. मात्र, त्यांनाही आवश्यक ते दाखले प्रांताधिकारी नसल्यामुळे मिळत नाहीत.
गेले महिनाभर प्रांताधिकारी नसल्यामुळे वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना दाखले मिळालेले नाहीत. ज्यांना तात्पुरता कार्यभार दिला आहे, ते अनेकदा दाखल्यांवर सह्या करण्यास होकार देत नाहीत. कायदेशीर बाबी पुढे करून तेही हात झटकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत आणखी भर पडू लागली आहेत. दरम्यान, लवकरच नवीन प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आता वाई, महाबळेश्वर तालुक्यांतून जोर धरू लागली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत तरी वाई उपविभागाला प्रांताधिकाऱ्यांसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. त्यातच तहसीलदारांचाही तीन वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांची बदली होणार आहे. (प्रतिनिधी)