महात्मा फुलेंचा वाडा जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: November 28, 2015 00:21 IST2015-11-27T22:58:10+5:302015-11-28T00:21:01+5:30

जयंती, पुण्यतिथीपुरतेच कटगुणकडे लक्ष : पर्यटन विकास आराखडा लालफितीत

Waiting for revitalization of Mahatma Phule Kahla | महात्मा फुलेंचा वाडा जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

महात्मा फुलेंचा वाडा जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

केशव जाधव -- पुसेगाव --स्वातंत्र, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, सामाजिक व आर्थिक न्याय, शोषणविरहित समाजरचना, समान संधी अशा महान नैतिक मूल्यांवर आधारित समाजरचनेचे स्वप्न ज्या महात्मा फुले यांनी पाहिले. त्यांच्याच कुलभूमी असणाऱ्या खटाव तालुक्यातील कटगुणकडे मात्र केवळ जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यापुरतेच पाहिले जात आहे.
राज्यासह या परिसरातील फुलेप्रेमी व ग्रामस्थांनी तयार केलेला पर्यटनविकास कार्यक्रम आराखडा अद्याप शासनाच्या लालफितीत अडकून पडला आहे. येथे शिल्पसृष्टी उभारून कटगुणला पर्यटनस्थळाचा ‘अ’ दर्जा देण्याची मागणी कित्येक वर्षे प्रलंबितच आहे. केवळ महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या दाम्पत्याला ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळविण्याबरोबरच कुलभूमी कटगुणच्या विकासातही लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. सातारा-पंढरपूर राज्यमार्गावर पुसेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर कटगुण आहे. संकेश्वर, निपाणीचे जगदगुरू शंकराचार्यांचे जन्मगाव तर महात्मा फुले यांची कुलभूमी. मात्र शासनाचा ढिसाळ कारभार व लोकप्रतिनीधींची उदासीनता यामुळे कटगुण अद्याप दुर्लक्षित राहिले आहे. ज्यांनी शिक्षणाची बाराखडी गळी उतरविली त्यांच्या कुलभूमीत सुधारणा करण्याचे औदार्य शासनकर्त्यांनी अद्याप दाखविले नाही. गावात फुले यांच्या मालकीच्या जागेत स्मारकाची भव्य इमारत आहे. त्या स्मारकाची दुरवस्था झाली असून, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. काही ठिकाणी पडझड झाली आहे. स्मारकाची देखभाल करण्यासाठी कायमस्वरूपी नोकर नाही. स्मारक परिसरात फुलेंचा पुतळा उभारण्यासाठी चबुतरा बांधण्यात आला होता; मात्र शासनाच्या धोरणामुळे तब्बल दहा-बारा वर्षांनंतर पुतळ्याचे अनावरण झाले. यावरूनच शासनाची फुले दाम्पत्याच्या कार्याबद्दलची उदासीनता लक्षात येत आहे.
महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून कटगुण येथे अकलूजप्रमाणे शिल्पसृष्टी जीवनपट उभारण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते; पण यासाठी उभारलेली भव्य इमारत आजही रिकामीच आहे.


पर्यटन आराखडा अद्याप कागदावरच !
आठ-दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या चबुतऱ्यावर २० फेबु्रवारी २००९ रोजी महात्मा फुले यांचा पुतळा बसविला.
महात्मा फुले कटगुणला आल्यावर दीनदुबळ्या व दलित लोकांच्या बैठका ज्या बौद्धविहारात घेत असत. त्या विहाराचा कायापालट होण्याची गरज आहे.
स्मारक परिसरात बगीचा व सुशोभीकरण, गावातील कित्येक रस्त्यांचे डांबरीकरण अद्याप नाही.
स्मारक पटांगणात बहुउद्देशीय सभागृह, शिल्पसृष्टी, ग्रंथालय, वाचनालय व व्यायामशाळा आदी विकासकामांबाबत कानाडोळा.
महात्मा फुले यांच्या जीवनातील ठळक प्रसंग शिल्प स्वरूपात अर्थात शिल्पसृष्टी उभारण्यासाठी बांधलेली इमारत धूळखात अद्याप पडून आहे.
कटगुणला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, याबाबतचा आराखडा शासनदरबारी सादर केला आहे. मात्र राज्यकर्त्यांना हे दिसतच नाही. जयंती, पुण्यतिथीला मंत्री, नेतेमंडळी येतात, आश्वासने देऊन निघून जातात. परिस्थिती मात्र जैसे थे आहे. लोकप्रतिनीधीही याबाबत उदासीन असून, पाठपुरावा करत नसल्याने फुलेप्रेमींच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Waiting for revitalization of Mahatma Phule Kahla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.