घाव सोसलेल्या झाडाला जिवंतपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:28+5:302021-01-08T06:07:28+5:30
०००००००० मजल्यावरून पाणी सातारा : बहुमजली इमारतीत शक्यताे वरच्या मजल्यावरील व्यक्तींनी खाली काही वस्तू टाकू नये असे नियम असतात ...

घाव सोसलेल्या झाडाला जिवंतपणा
००००००००
मजल्यावरून पाणी
सातारा : बहुमजली इमारतीत शक्यताे वरच्या मजल्यावरील व्यक्तींनी खाली काही वस्तू टाकू नये असे नियम असतात तरीही साताऱ्यातील महिला घाण पाणी रस्त्यावर टाकत असतात. त्यामुळे वाहनचालकांच्या अंगावर उडत असल्याने भांडणे होत आहेत.
००००००००
विक्रेते अडचणीत
सातारा : सातारा जिल्ह्यात यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, कोरोनाचा शिरकाव झालेला असल्याने यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये ती रद्द केली आहे. मात्र, यात्रांवर अवलंबून असलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ते कुटुंब अडचणीत आले आहेत.
०००००००
कठड्यांची दुरवस्था
पेट्री : यवतेश्वर घाटात बहुतांशी ठिकाणी संरक्षक कठडयांची दूरवस्था झाली आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळले तसेच नादुरूस्त अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी संरक्षक कठड्यांना झुडपांचा विळखा बसल्यामुळे संरक्षक कठडे दिसत नाहीत. यामुळे वाहतूक धोकादायक ठरते.
---------
गल्लोगल्ली आमिष
सातारा : साताऱ्यातील अनेक भागांत लहान-लहान टपऱ्यांवरही झटपट कर्ज देणार असल्याबाबत फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे बेरोजगार तरुणाई बळी पडत असल्याचे समोर येत आहे. याबाबत संबंधित विभागाने चौकशी करून अशांवर आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
००००००००
रुग्णालयांत गर्दी
सातारा : साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात पूर्वी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यामुळे इतर आजार असणारे जिल्हा रुग्णालयात जात नव्हते. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले असल्याने रुग्णालयांत गर्दी होत आहे.
---------
कास तलावावर पावलोपावली काचा
पेट्री : कास तलावावर ओल्या पार्ट्या झोडल्या जात असून काहीजण राजरोसपणे मद्यपान करताना दिसत आहेत. दरम्यान, मद्यपान करून तेथेच तलावाकाठी दारूच्या काचेच्या बाटल्या फोडल्याने ठिकठिकाणी काचांचे तुकडे पडलेले पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यटक व वन्यजीवांच्या पायाला इजा होण्याचा संभव नाकारता येत नाही.
००००००००
उशिरापर्यंत हॉटेल सुरू
सातारा : साताऱ्यातील अनेक हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. रात्री अकरानंतर जमावबंदी आदेश लागू केलेला असतानाही हे हॉटेल सुरू असतात. अकरानंतर हॉटेलचे दार बंद केले जाते. ग्राहक आल्यानंतर किंवा त्याला बाहेर जायचे असेल तर ते उघडले जाते.
०००००००००
बालमजुरी सुरूच
सातारा : कायद्याने बालकांना कोणतेही काम करण्यास भाग पाडणे हा गुन्हा मानला जातो तरीही जिल्ह्यातील अनेक हॉटेलमध्ये अठरा वर्षांखालील मुलं मजुरी करत असतात, अशा तक्रारी अनेक नागरिक करत असतात. मात्र, याबाबत तक्रारी करण्यास कोणी पुढे येत नाहीत, हे दुर्दैव आहे.
००००००
शेतकऱ्यांना धास्ती
मायणी : मायणीसह कलेढोण परिसरातील शेतकरी द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असतात. मात्र, सातारा, फलटण तालुक्यात दोन दिवस पाऊस पडत आहे. त्यामुळे हा पाऊस मायणी परिसरात पडला तर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले आहे.
---------
सूर्यदर्शन दुर्मीळ
सातारा : सातारा शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सूर्यनारायणांचे दर्शन घडलेले नाही. त्यामुळे परिसरात रोगट वातावरण निर्माण तयार झाले आहे. त्याचा शरीरावरही दुष्परिणाम होण्याचा धोका वर्तविला जात आहे. वातावरण कधी निवळणार याकडे लक्ष लागले आहे.
००००००
घरभेटीवर भर
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने अंतिम चित्र तयार झाले आहे. त्यामुळे आता प्रचाराला वेळ कमी राहिला आहे. याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घरभेटीवर भर दिला आहे.
०००००००
चिलटांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त
सातारा : साताऱ्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून चिलटांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री दुचाकी गाडीच्या उजेडाच्या दिशेने ते येत असतात. त्यात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घातले जातात. हे मास्क मास्कमध्ये घुसत असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकजण दिवे बंद करत असतात पण ते धोक्याचे ठरू शकते.
००००००
ब्लँकेट विक्रेते त्रस्त
सातारा : साताऱ्यातील अनेक रस्त्यावर मऊ ब्लँकेट विकण्यासाठी विक्रेते माल घेऊन आलेले आहेत. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे कधीही पाऊस येईल असे वातावरण असल्याने किती ब्लँकेट बाहेर काढायचे असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
००००००००
काकवीला मागणी
सातारा : जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तालुक्यातील अनेक भागात आजही गुऱ्हाळघर चालविले जाते. त्याठिकाणी खात्रीशीर गूळ, काकवी मिळत असते. त्यामुळे या काकवीला ग्राहकांतून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. अनेकजण ती गावीही पाठवत असतात.
०००००००
महामार्गावरच एस.टी.चा थांबा धोक्याचा
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने प्रवासी घेण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी उभी करू नयेत, असा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता तरीही शिरवळपासून कऱ्हाडपर्यंत ठिकठिकाणी एस. टी. तसेच खासगी वाहने प्रवासी घेण्यासाठी थांबत असतात. त्यामुळे तेथेच प्रवासीही गाड्यांची वाट पाहत थांबलेले असतात. हा प्रकार सर्वांसाठीच धोक्याचा ठरू शकतो. त्यामुळे महामार्गावर कोणालाही वाहने उभी करू देऊ नये, अशी मागणी केली जात आहे.
००००००
आडवा फोटो ०५आदर्की-हॉर्स
आठ महिन्यांनी नाचला घोडा...!
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला अन् लग्न, यात्रा, जत्रा, मिरवणुका बंद करण्यात आल्या. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर आठ महिन्यांनंतर परवानगी देण्यात आली. विवाह सोहळ्यांत घोडे नाचणार असल्याने घोडेमालक त्यांच्याकडून नाचण्याचा सराव करून घेत आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)