नम्रता भोसले - खटाव -लोकसभा निवडणूक निर्णायक ठरवून ‘नमो’ लाटेवर भाजपचे सरकार देशात सत्तेवर आले. मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि खटावकरांच्या आशा पल्लवित झाल्या. राजकीय तसेच सामाजिक जीवनातील गुरु लक्ष्मणराव इनामदार याचे मूळ गाव खटाव असल्यामुळे आता गुरुंच्या गावी पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचे आगमन होणार ही बातमी येऊन थडकल्यामुळे आता लहान-थोर व्यक्तींमध्ये उत्सुकता लागली आहे ती मोदींच्या खटावभेटीची. नरेद्र मोदींना लहानपणापासून मार्गदर्शन करणारे, त्यांच्या राजकीय, सामाजिक घडणीत मोलाचा वाटा असणारे, ‘वकीलसाहेब’ या टोपणनावाने सर्वपरिचित असणारे गुरू लक्ष्मणराव इनामदार खटावचे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम गुजरातमधून केले.इनामदारांनी मोदींवर संघाचे संस्कार केले. नरेंद्र मोदी यांना घडवण्यात इनामदारांचा मोठा वाटा आहे. दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांचे एक बंधू अहमदाबाद येथे स्थायिक आहेत. खटावमध्ये सध्या अस्तित्वात असलेले लक्ष्मीनारायण मंदिराची इनामदार यांच्या पश्चात त्यांच्या चुलतबंधूुनी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून जोपासना केली आहे. आतापर्यंत हे मंदिर खटावमधील लोकांना परिचित होते. परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान लक्ष्मणराव इनामदार हे खटावचे, तसेच त्यांनी सुरुकेलेल्या लक्ष्मीनारायण ट्रस्टच्या माध्यमातुन उभे असणारे भव्य मंदिर याविषयी माहिती वाचनात आल्यापासून खटावबद्दल बोलताना ‘पंतप्रधांनाच्या गुरुंचे गाव’ म्हणून संबोधले जात आहे. आपल्या गुरुच्या जन्मगावी भेट देणार असल्याचे मोदी यांनी सांगितले होते. त्यामुळे चक्क पंतप्रधान खटावला भेट देणार म्हणून गावकऱ्यांचीही उत्सुकता वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदींचे आगमन होणार का? इनामदार यांच्या तैलचित्राचे अनावरण मोदींच्या हस्ते करण्याचा मानस लवकरच पूर्ण होईल का, अशी उत्सुकता आणि आशा खटाववासीयांना लागली आहे.
लहानथोरांना उत्कंठा मोदींच्या खटाव भेटीची
By admin | Updated: September 15, 2014 23:21 IST