सत्तासंघर्षाच्या लढाईत गावनेते मग्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:39+5:302021-01-08T06:06:39+5:30

खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण खंडाळा तालुक्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी गावोगावी विविध पक्षीय ...

Village leaders engrossed in power struggle ... | सत्तासंघर्षाच्या लढाईत गावनेते मग्न...

सत्तासंघर्षाच्या लढाईत गावनेते मग्न...

खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण खंडाळा तालुक्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी गावोगावी विविध पक्षीय पॅनेलअंतर्गत लढती होत आहेत. बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध कुठे भाजपा, काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे पॅनेल दंड थोपटून उभे ठाकले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील गावनेते सत्तासंघर्षाच्या राजकारणात मग्न आहेत.

खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला होता. त्यापैकी सात ग्रामपंचायतींसह १३१ जागा बिनविरोध झाल्याने ५० ग्रामपंचायतींत ३२० जागांसाठी लढती होत आहेत. ६९८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्राबल्य राखले आहे. परंतु गत जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. गावोगावी राष्ट्रवादीने पुन्हा बळकटी दिली असली तरी, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीविरोधात विरोधी पक्षही सक्षम झाले आहेत. वास्तविक, आमदार मकरंद पाटील यांच्या वैयक्तिक जनसंपर्कामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधी प्रभाव जाणवला नसला तरी, ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक गटबाजीमुळे ते दिसून येण्याची शक्यता आहे. त्यातच तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणच्या निवडणुका होत असल्याने गावनेते सक्रिय झाले आहेत.

तालुक्यातील भादे, अंदोरी, अहिरे, पारगाव, खेड बुद्रुक, पाडळी, विंग, बावडा, शिवाजीनगर, नायगाव, जवळे, शिंदेवाडी, कवठे, पिंपरे बुद्रुक या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत, तर काही ग्रामपंचायतींमध्ये अंतर्गत मतभेदामुळे तिहेरी पॅनेल लढत देत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडी झाल्या. स्थानिक काँग्रेसच्या मोठ्या गटाने भाजपाला साथ दिली. माजी आमदार मदन भोसले यांच्या ताकदीमुळे मुळातच वाढत चाललेल्या भाजपाला आणखी बळ मिळाले. त्यामुळे हाच गट ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात पुढे सरसावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधक चांगलं बाळसं धरण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक गावांमध्ये राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटांनी एकमेकांविरुध्द दंड थोपटल्याने तेथील लढतीकडे लक्ष लागले आहे, तर ग्रामपंचायतीच्या निमित्ताने गटा-तटात चालणाऱ्या राजकारणाने घरा-घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे घरा-घरात राजकीय वातावरण ढवळून निघणार हे निश्चित आहे.

खंडाळा तालुक्यात मध्यंतरीच्या काळात वंचित बहुजन आघाडीने उभारी घेतली होती. बहुतांशी गावांत त्याच्या शाखाही उघडण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत विविध पक्षांच्या स्थानिक आघाडीत वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांना संधी दिली आहे. मात्र, या आघाडीला स्वतंत्रपणे पॅनेल उभे करता आले नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पक्षाचे असणारे पॅनेल काही गावे वगळता कोठेही दिसून येत नाहीत. त्यामुळे हा पक्ष पुन्हा उभारी घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. याउलट गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी धावपळ करताना दिसत आहेत. मात्र, नक्की बाजी कोण मारणार, हे जनतेचा कौल आल्यानंतरच कळणार आहे.

चौकट..

बिनविरोध सत्ता....

तालुक्यातील सात गावे बिनविरोध झाली असून, यामध्ये पळशी, कराडवाडी, वाण्याचीवाडी, लिंबाचीवाडी, हरळी, कान्हवडी, घाडगेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पळशी गाव मोठे असले तरी बिनविरोध करून गावाची एकी राखली गेली. तसेच घाडगेवाडी गावाने सलग तीस वर्षे बिनविरोध निवडणुकीचा डंका वाजविला. भादवडे गावाने बिनविरोधचा प्रयत्न करूनही एका जागेची माघार झाली नसल्याने, तेथे लढत होत आहे. तसेच राजकीय संघर्षानंतर हरळी व कराडवाडी गाव एकत्रित झाले आहे.

........................

खंडाळा - ग्रामपंचायत वार्तापत्र

Web Title: Village leaders engrossed in power struggle ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.