विकासपर्व हरपले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:00+5:302021-01-08T06:04:00+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार, विधी व न्यायमंत्री, सहकार चळवळीतील दीपस्तंभ, समाजकारणातील भगीरथ, जलक्रांतीचे प्रणेते, कऱ्हाड दक्षिणचे विकासक विलासराव ...

विकासपर्व हरपले...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार, विधी व न्यायमंत्री, सहकार चळवळीतील दीपस्तंभ, समाजकारणातील भगीरथ, जलक्रांतीचे प्रणेते, कऱ्हाड दक्षिणचे विकासक विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सोमवारी निधन झाले. जिल्ह्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणावर आपली वेगळी छाप पाडणाऱ्या या लोकनेत्याच्या कार्याचा घेतलेला आढावा...
- प्रमोद सुकरे, कऱ्हाड
कऱ्हाड तालुक्याच्या आणि राज्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात १९६७ पासून कार्यरत झालेलं नेतृत्व म्हणजे विलासकाका पाटील-उंडाळकर. वडील स्वातंत्र्यवीर दादासाहेब पाटील-उंडाळकर यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ब्रिटिशांच्या जुलमाविरोधात संघर्ष केला. तुरुंगवास भोगला. कुटुंबाचा हा सामाजिक वारसा पुढे सुरू ठेवत विलासराव पाटील समाजकार्यात सक्रिय झाले. समाजात बदल घडवायचा असेल तर राजकीय सत्ता महत्त्वाची असते, हे जाणून १९६७ मध्ये ते राजकारणात सक्रिय झाले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या ते सान्निध्यात आले आणि त्यांनी सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्या माध्यमातून तळागाळातील समस्या, लोकांच्या अडचणी सोडविण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले. ग्रामीण भागात मूलभूत सोयी-सुविधा यायला सुरुवात झाली, अन् कऱ्हाड दक्षिणच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राजकीय सत्ता सर्वसामान्यांसाठी वापरली. १९८० मध्ये कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविली. त्यानंतर सलग ३५ वर्षे आमदार म्हणून कार्यरत राहत त्यांनी विजयाची सप्तपदी पूर्ण केली.
दरम्यानच्या काळात साखर कारखानदारी, राजकारणातील विरोधी शक्ती यांच्याविरोधात सर्वसामान्य माणसांचे नेतृत्व म्हणून रयत संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विकासाची चळवळ उभी केली. कार्यकर्त्यांचे ते ‘गॉडफादर’ बनले. स्वकर्तृत्वावर राज्याच्या राजकारणात त्यांनी दबदबा तयार केला. सत्ता असो वा नसो, मतदार संघाच्या विकासाचा ध्यास त्यांनी कायम ठेवला आणि कऱ्हाड दक्षिणमधील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करण्याचे काम त्यांनी केले. राजकीय चारित्र्य स्वच्छ ठेवत त्यांनी स्वत:ला समाजहितासाठी वाहून घेतले. त्यांच्या त्यागाची, कल्पक नेतृत्वाची फळे कऱ्हाड दक्षिणमधील जनता आज चाखत आहे.
विलासकाकांची लाईफस्टाईल सर्वांपेक्षा वेगळी होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्या ठायी पाहायला मिळाले. त्यांची विचारशक्ती अफाट होती. गाव, वाडी, वस्तीवरील कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखत होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची नाळ पाहिली की, लोकसंग्रह असलेला नेता, असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल. जोडलेली माणसे हेच त्यांचे भांडवल होते. म्हणूनच लोहचुंबकासारखे गत चाळीस वर्षे लोक त्यांना चिकटून होते.
काकांचे उंडाळे हे गाव स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी येथे स्वातंत्र्यसैनिकांचे अधिवेशन आयोजित करून तो वारसा जतन करण्याचे काम त्यांनी केले.त्याचबरोबर स्मारक समितीच्यावतीने मराठी साहित्य संमेलन हा उपक्रम राबवून प्रबोधनाचा जागरही त्यांनी अविरतपणे चालू ठेवला. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सुरू केलेल्या अनेक संस्था, अनेक उपक्रम या भविष्याच्या वाटचालीमध्ये त्यांच्या विचारांचे पाईक असणाऱ्या वारसदारांनी चांगल्या पद्धतीने सुरू ठेवणे, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.
- चौकट
वारणा मिळाली कृष्णेला
देशातील पहिला नदीजोड प्रकल्प कऱ्हाड दक्षिण मतदार संघामध्ये पूर्ण झाला असून वारणा मिळाली कृष्णेला हे चित्र आज पाहायला मिळत आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे, याकरिता विलासराव पाटील यांनी आपल्या भगीरथ प्रयत्नांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून १९ डिसेंबर १९९८ ला वाकुर्डे उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली. आज ती योजना प्रत्यक्ष कार्यरत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे.
- चौकट
माथा ते पायथा जलक्रांती
स्वातंत्र्यानंतर तीस वर्षे पूर्ण होऊनही कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील डोंगरी भाग विकासापासून वंचित होता. भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गाव तिथे तलाव ही संकल्पना त्यांनी पुढे नेली. कोट्यवधीचा निधी सिंचन प्रकल्पांना उपलब्ध करून दिला. लघू प्रकल्प, तलाव, साठवण तलाव, नालाबंडींग अशा पद्धतीने डोंगराच्या उगमापासून मुख्य नदी-नाल्यापर्यंत साखळी बंधारे बांधून पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचा फायदा लोकांना नक्कीच झाला.