‘गांडूळखत’ प्रकल्पात सापांचा सुळसुळाट!

By Admin | Updated: August 19, 2015 21:16 IST2015-08-19T21:16:44+5:302015-08-19T21:16:44+5:30

कऱ्हाडातील खत प्रकल्पाचे तीनतेरा : पालिकेच्या प्रकल्पातील ‘गांडुळां’सह ‘खत’ही गायब़; घनकचरा नियोजनाचा प्रश्न अधांतरीच, सभागृहात केवळ चर्चा

'Vermicompost' project is full of snakes! | ‘गांडूळखत’ प्रकल्पात सापांचा सुळसुळाट!

‘गांडूळखत’ प्रकल्पात सापांचा सुळसुळाट!

संतोष गुरव - कऱ्हाड शहराच्या विस्ताराबरोबरच घनकचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. याचाच विचार करून पालिकेच्या वतीने सुमारे बारा वर्षांपूर्वी येथील बाराडबरी परिसरात घनकचऱ्यापासून गांडूळखत तयार करण्याचा प्रकल्प उभारला होता. मात्र, पालिकेतील लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे केवळ अडीच वर्षांत या प्रकल्पाचे तीनतेरा वाजले. एकेकाळी चांगल्या चालणाऱ्या गांडूळखत प्रकल्पातील सध्या गांडुळे व खतही आता गायब झाले आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये सध्या कामगार वास्तव्य करत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पाबाबत नगरसेवकांकडून मासिक सभेत नुसते विषय मांडून त्यावर वायफळ चर्चा केली जाते; मात्र प्रत्यक्ष कार्यवाही काहीच केली जात नाही. त्यामुळे कोट्यवधी खर्च करून उभारलेला गांडूळखत प्रकल्प सुरू होण्याऐवजी बंद अवस्थेतच आहे. येथे उंदीर, सापांचा वावर आहे. शहरात स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे. २४ बाय ७ योजना कधी पूर्ण होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे नव्या योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे जुन्या योजनांना तिलांजली वाहण्याचे काम पालिकेने केले आहे. शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कुंड्या कचऱ्याने भरून वाहत आहेत. कचऱ्यापासून गांडूळखत तयार करण्यासाठी पालिकेने २००३ मध्ये कोट्यवधींचा खर्च करून प्रकल्प उभारला होता.
दररोज दोन टन असे वर्षाला एकूण सातशे टन खत तयार करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. यामुळे अनेकांना या खताचा फायदा झाला असता आणि त्यातून पालिकेलाही उत्पन्न मिळाले असते; परंतु लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे अडीच वर्षांत हा प्रकल्प बंद पडला. प्रकल्पाच्या ठिकाणी कामगारांचे वास्तव्य आणि उंदीर, सापांचा वावर आहे. प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या जाळीत गांडूळ व खत ठेवले जात होते. मात्र तीही जाळी आता तुटून गेली आहे. तर प्रकल्पाच्या इमारतीचा रंग नाहीसा झाला असून, भिंतीही जीर्ण झाल्या आहेत.
पालिकेने बांधलेला गांडूळखत प्रकल्प हा अनेक दिवसांपासून बंद पडलेला आहे. मात्र बंद पडलेल्या या प्रकल्पाबाबत कोणतीच कार्यवाही अद्यापही पालिकेकडून करण्यात आलेली नाही. पालिकेकडून वर्षभरात शहरातील विविध विकासकामांवर ठराविक निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु लोकप्रतिनिधींमधील अंतर्गत संघर्षामुळे एकही विकासकाम शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाही. शहरात अजूनही काही विकासकामे अपूर्ण अवस्थेतच आहेत. टाऊन हॉल गार्डन, शिवाजी क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, कोल्हापूर नाका येथील स्वागत कमान, जलतरण तलाव, २४ बाय ७ योजना अशी अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. जी विकासकामे झाली आहेत. त्याचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे केलेल्या विकासकामांचे तीनतेरा वाजले आहेत. हीच परिस्थिती गांडूळखत प्रकल्पाची झाली आहे.

अंतर्गत राजकारणामुळे प्रकल्पाचे तीनतेरा...
पालिकेने उभारलेला गांडूळखत प्रकल्प सुरुवातील चांगल्या पद्धतीने सुरू होता. त्यातून पालिकेला चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, पालिकेतील राजकारणामुळे हा प्रकल्प बंद पडला आहे. त्याचा पालिकेला जास्त तोटा होत आहे. दोन्ही आघाड्यांकडून केल्या जाणाऱ्या राजकारणामुळे प्रकल्पाचे तीनतेरा वाजले असल्याचे स्थानिक नागरिकांतून सांगितले जात आहे.
प्रकल्प पुन्हा सुरू होणे शक्य नाही !
घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे बारा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला गांडूळखत प्रकल्पअंतर्गत राजकारणामुळे बंद पडला. त्यानंतर प्रकल्प सुरू करण्याबाबत केवळ सभागृहात चर्चा होत गेली; मात्र प्रत्यक्ष कोणीही पुढाकार घेतला नाही. या प्रकल्प सुरू करण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा सुरू होणे शक्य नाही.

इमारतीमध्ये साप अन् उंदरांचा खेळ
पालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पातील प्रवेशद्वारालगत असलेल्या प्रकल्पाधिकाऱ्यांच्या इमातीचीही दुरवस्था झाली आहे. इमारतीचे दरवाजे मोडले असून, इमातीत साप, उंदराचा वावर होताना दिसून येत आहे.

गांडूळखताच्या जाळीची दुरवस्था...
गांडूळखत प्रकल्पातील खतनिर्मितीसाठी तयार करण्यात आलेली जाळीची किंमत जास्त असते. या जाळीमध्ये गांडूळखत तयार केले जाते. मात्र, बाराडबरी परिसरात बंद पडलेल्या गांडूळखत प्रकल्पातील जाळीची दुरवस्था झाली आहे.

Web Title: 'Vermicompost' project is full of snakes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.