वाहनांनी साडेतीन हजार जीव चिरडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:37 AM2021-05-14T04:37:50+5:302021-05-14T04:37:50+5:30

कऱ्हाड : अपघातात कुणाचा जीव गेला तर आपण हळहळतो; पण दररोज अनेक निष्पाप जीव वाहनांच्या टायरखाली सर्रास चिरडले जात ...

Vehicles crushed three and a half thousand lives! | वाहनांनी साडेतीन हजार जीव चिरडले!

वाहनांनी साडेतीन हजार जीव चिरडले!

Next

कऱ्हाड : अपघातात कुणाचा जीव गेला तर आपण हळहळतो; पण दररोज अनेक निष्पाप जीव वाहनांच्या टायरखाली सर्रास चिरडले जात आहेत. त्याची कुणाला दाद नाही आणि सोयरसुतक तर नाहीच नाही. गत काही वर्षांत असेच तब्बल साडेतीन हजार जीव वाहनांनी चिरडल्याची धक्कादायक बाब कऱ्हाडच्या ‘एम. एन. रॉय’ या पर्यावरणीय संस्थेने केलेल्या निरीक्षणातून समोर आली आहे.

अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असणाऱ्या प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. वाहनांच्या धडकेतही दरवर्षी शेकडो प्राणी-पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. गत एकोणीस वर्षांत ३ हजार २२८ प्राणी व पक्ष्यांचा वाहनांखाली बळी गेल्याचा निष्कर्ष एम. एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेने निरीक्षणातून काढला आहे. संस्थेच्या पर्यावरण विभागाचे संचालक सुधीर कुंभार यांनी २००२ सालापासून निरीक्षणाचे काम हाती घेतले. अल्केश ओहळ, देवानंद पांढरपट्टे, बबन साबळे, सुनील जंगम, बी. ए. चोरघे यांची त्यासाठी त्यांनी मदत घेतली. कऱ्हाड ते ढेबेवाडी या २५ किलोमीटर रस्त्याची निरीक्षणासाठी निवड करण्यात आली. दररोज न चुकता डॉ. कुंभार यांच्यासह त्यांचे सहकारी या मार्गावरून प्रवास करतात. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पक्षी व प्राण्याची ते नोंद घेतात. त्याचे छायाचित्र घेतात. तसेच ही सर्व माहिती ते संकलित करून वर्षाअखेरीस त्याचे वर्गीकरण करतात. गत एकोणीस वर्षांपासून त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे.

- चौकट

काही वाचवतात; काही मुद्दाम चिरडतात!

निरीक्षणाचा एक भाग म्हणून डॉ. सुधीर कुंभार यांनी काही चालकांशी चर्चा केली. त्यावेळी काहींनी प्राणी, पक्षी रस्त्यावर दिसल्यास त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले. मात्र, ‘प्राणी, पक्ष्यांसाठी स्वत:चा जीव धोक्यात कसा घालणार?’ असेही काहींनी सांगितले. प्राणी किंवा पक्ष्याला मुद्दाम चिरडणारे काही बेदरकार चालकही असल्याचे डॉ. कुंभार यांनी सांगितले.

- चौकट

अन्नासाठी मृत्यूच्या दाढेत

रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या प्राण्याचे मांस खाण्यासाठी येणाऱ्या इतर प्राणी व पक्ष्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे.

- कोट

प्राणी असो अथवा पक्षी, तेही एक जीवच आहेत. हे जीव वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जबाबदारीने वाहन चालविल्यास असे मृत्यू टाळता येतील. त्यासाठी आम्ही चालकांमध्ये जागृती करतो. तसेच जखमी प्राणी अथवा पक्षी सापडल्यास त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देतो.

- डॉ. सुधीर कुंभार, संचालक,

एम. एन. रॉय संस्था, कऱ्हाड

- चौकट

अपघाती मृत्यूचे प्रमाण

सरपटणारे प्राणी : ४८%

सस्तन प्राणी : ३३%

पक्षी : १९%

- चौकट

दहा वर्षांतील बळी

वर्ष : प्राणी : पक्षी

२०१०-११ : १८९ : ६२

२०११-१२ : १४८ : ५२

२०१२-१३ : १७८ : ६४

२०१३-१४ : १४० : ५१

२०१४-१५ : १२९ : ३३

२०१५-१६ : ११३ : २९

२०१६-१७ : १०० : ६३

२०१७-१८ : १३४ : ५०

२०१८-१९ : १४५ : ५५

२०१९-२० : १८० : १०९

२०२०-२१ : ११४ : ३३

- चौकट

एप्रिल २०२० ते मार्च २०२० अखेर...

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या एका वर्षात ३१ सरडे, ३५ साप, ७ कोंबड्या, २ बुलबुल, १ बगळा, ३ सातभाई, ३ भारद्वाज, २० श्वान, १२ मांजर, १० उंदीर, १ मुंगूस, १ वानर, १ उदमांजर, १ खार असे ६८ सरपटणारे प्राणी, ३३ पक्षी आणि ४६ सस्तन प्राणी २५ किलोमीटरमध्ये वाहनाखाली चिरडल्याचे समोर आले.

फोटो : १३केआरडी०१

कॅप्शन : प्रतीकात्मक

Web Title: Vehicles crushed three and a half thousand lives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.