भ्रष्टाचारासाठीच सत्तेचा वापर
By Admin | Updated: September 15, 2014 23:25 IST2014-09-15T21:22:45+5:302014-09-15T23:25:23+5:30
पंकजा मुंडे : फलटण येथे संघर्ष यात्रेत ‘आघाडी’वर हल्लाबोल

भ्रष्टाचारासाठीच सत्तेचा वापर
फलटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने गेली पंधरा वर्षे सत्ता केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच वापरली आहे. त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. याच काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, राज्याला अधोगतीला नेणाऱ्या दोन्ही काँगे्रसची सत्ता विधानसभा निवडणुकीत उलथवून टाका,’ असे आवाहन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.
आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचे आज, रविवारी येथे आगमन झाले. त्यावेळी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश भाजपच्या सरचिटणीस कांताताई नलवडे, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, ‘रासप’चे जिल्हाध्यक्ष बजरंग गावडे, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, नगरसेवक अनुप शहा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दशरथ चांगण, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, बजरंग खटके, विराज खराडे, दादासाहेब चोरमले, डॉ. वि. रा. त्रिपुटे, उत्तमराव भोसले उपस्थित होते.
आ. मुंडे-पालवे म्हणाल्या, ‘वीस वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी जनसामान्यांसाठी संघर्षयात्रा काढून काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले होते. आता त्यांचा वारसा मी गोरगरिबांच्या आशीर्वादावर जपत संघर्षयात्रा काढली आहे. काँग्रेस आघाडीने भ्रष्टाचार, अत्याचार व मनमानी कारभार चालविला आहे. त्याचा भांडाफोड या माध्यमातून करून जनतेत जनजागृती करण्याचा आपला प्रयत्न आहे.’
‘धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली. त्यांचे अखेरचे भाषणही चौंडी येथे झाले होते. माझ्या संघर्ष यात्रेची सांगताही चौंडी येथेच होणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. सामान्य माणसेच क्रांती घडवतात. गोपीनाथ मुंडेंनी क्रांती घडविली. महादेव जानकर यांनी बारामतीकरांच्या तोंडाला फेस आणला. सदाभाऊ खोत यांनी साखरसम्राटांना जेरीस आणले, तर नरेंद्र मोदींसारखा सामान्य माणूस पंतप्रधानपदी बसतो, हे येथील सर्वसामान्य जनताच करू शकते,’ असेही मुंडे-पालवे म्हणाल्या. यावेळी सदाभाऊ खोत यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)