अस्वस्थ कार्यकर्ते धडकले थेट पालिकेवर!
By Admin | Updated: August 20, 2016 22:09 IST2016-08-20T22:07:47+5:302016-08-20T22:09:16+5:30
कऱ्हाडात उत्सव समितीचा मोर्चा : प्रांताधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन; सर्व्हे केल्यानंतरच मंडळांबाबत अंतिम निर्णय देण्याची प्रांताधिकाऱ्यांची भूमिका

अस्वस्थ कार्यकर्ते धडकले थेट पालिकेवर!
कऱ्हाड : गणेशोत्सव व नवरात्रोत्सव कालावधीत मंडळांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल, अशा सूचनेचे पत्र मुख्याधिकारी यांनी गणेश मंडळांना नुकतेच पाठविले. त्याच्या निषेधार्थ शनिवारी येथील हिंदू उत्सव महासमितीच्या वतीने प्रांत व मुख्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासन व महासमितीचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेत शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्ते, वाहतूक मार्ग यांचा सर्व्हे करून नकाशा तयार केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी सांगितले.
गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात पाळण्यात येणाऱ्या सूचनेबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या नियम व सूचनांच्या आदेशाचे पत्र मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी शहरातील १७६ गणेशोत्सव मंडळांना पाठविले. पत्रानुसार गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणीसंदर्भात प्रशासनाची परवानगी घेणे, नियमांत राहून गणेशोत्सव साजरा करणे याबाबत माहिती दिली आहे. संबंधित पत्र हे मंडळांशी चर्चा न करता पाठविले असल्याने तसेच काही मंडळांवर कारवाई करत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या या प्रकारानिषेधार्थ येथील हिंदू उत्सव महासमितीचे पदाधिकारी यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नगरसेवक विनायक पावसकर, विक्रम पावसकर, हणमंत पवार, विनायक मुळे, दादा शिंगण, सुदर्शन पाटसकर आदी उपस्थित होते.
हिंदू उत्सव महासमितीचे विनायक पावसकर, नगरसेवक विक्रम पावसकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी किशोर पवार यांच्याशी चर्चा केली. प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, कऱ्हाड शहरचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव उपस्थित होते.
यावेळी शहरात पोलिस प्रशासनाच्या सूचनेचे व आदेशाचे पालन करतच सार्वजनिक मंडळे धार्मिक सण, उत्सव साजरे करतात. मात्र, पालिका प्रशासनाकडून मंडळांना सहकार्य केले जात नाही. त्यामुळे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व सूचनेबाबत प्रशासनाने मंडळांशी चर्चा केल्यानंतरच योग्य निर्णय घ्यावा, अशा प्रकारच्या नोटिसा व पत्र पाठवू नये असे महासमितीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर प्रांताधिकारी किशोर पवार यांनी गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाकडून शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे मार्ग, शांतता क्षेत्र, रस्त्यांची स्थिती याबाबत पाहणी करून त्याचा नकाशा तयार करण्यात येईल व त्यानंतर गणेश मंडळाच्या अध्यक्षांशी बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.
प्रांताधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हिंदू उत्सव महासमितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक विनायक मुळे, हणमंत पवार यांनी देखील चर्चा केली. (प्रतिनिधी)
मुख्याधिकारी....‘इगो’ बाजूला ठेवून चर्चा करा !
‘शहरातील प्रत्येक कामांबाबत निर्णय घेताना तसेच कारवाई करताना मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडून नगरसेवक, मंडळ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे. कऱ्हाड शहराला मोठी सण-उत्सवांची परंपरा आहे. मात्र, मुख्याधिकाऱ्यांकडून शहरातील भौगोलिक परिस्थितीचा विचार केला जात नाही. तसेच निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींची विचारणाही केली जात नाही. त्यांना इगो प्रॉब्लेम असल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते. त्यामुळे त्यांनी अगोदर आपला इगो बाजूला ठेवावा. मग चर्चा करावी,’ असे नगरसेवक विनायक पावसकर यांनी मोर्चादरम्यान सांगितले.
प्रशासनाचे नियम पाळावेच लागणार !
‘प्रशासनाच्या वतीने शहरात सण, उत्सव काळात शांतता राखण्याचे काम केले जाते. शहरातील गणेशोत्सव मंडळांना उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचे पत्र पाठविण्यात आल्याने मंडळांनी याबाबत प्रशासनाशी चर्चा करावी, याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ आहे. प्रशासनाचे नियम कोणत्याही परिस्थितीत मंडळांना पाळावेच लागणार आहेत. याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करू,’ अशा सूचना प्रांताधिकारी किशोर पवार यांनी चर्चेदरम्यान कार्यकर्त्यांना दिल्या.
मंडळांच्या मंडपाच्या निर्णयाबाबत मंगळवारी बैठक
कऱ्हाड शहरातील सार्वजनिक मंडळांकडून रस्त्यावरच मंडप घातले जातात. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून अगोदर प्रशासनाकडून वाहतूक अडथळा ठिकाणांचा सर्व्हे, नकाशा करण्यात येणार आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवार, दि. २३ रोजी दुपारी चार वाजता प्रशासन व मंडळांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे.
हिंदू उत्सव महासमितीच्या मागण्या...
बदलेल्या वाहतुकीचा आराखडा प्रसिद्ध करावा.
गणेशोत्सव काळात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा.
रस्त्यांवरील खड्डे मुरूमाऐवजी डांबर टाकून मुजवावेत
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत.
देखावे सादरीकरण व स्पीकर परवान्यासाठी सहा दिवस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी.
न्यायालयाच्या सूचनेचे
पालन केले आहे : मुख्याधिकारी
‘गणेशोत्सव साजरा करताना नियम पाळावेत अशा खुद्द उच्च व सर्वोच्च न्यायालयानेच सूचना दिलेल्या आहेत. त्याबाबतचे आदेश प्रशासनास दिले असल्याने त्याचेच पालन करत आपण पत्र पाठविले आहे. तसेच नियम मोडणाऱ्या मंडळांना नोटिसाही दिलेल्या आहेत,’ असे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी चर्चेदरम्यान मत व्यक्त केले.
‘मेहरबानांना’ पत्र अडचणीत
आणण्यासाठी पाठविले !
पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांच्याकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारात न घेता निर्णय घेतले जातात. त्यामुळे आताही उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत नगरसेवकांना मुख्याधिकाऱ्यांनी पत्र पाठविले. त्या पत्राचे आदेश नगरसेवकांनी केले नाही तर ते अडचणीतही येऊ शकतील. याउद्देश्याने मुख्याधिकाऱ्यांनी पत्र पाठविले असावे, हे पत्र पाठविण्यामागचे कारण असल्याचे नगरसेवक विनायक पावसकर यांनी सांगितले.