अनधिकृत थांबे दोन दिवसच

By Admin | Updated: December 5, 2014 23:20 IST2014-12-05T22:11:55+5:302014-12-05T23:20:45+5:30

राष्ट्रीय महामार्ग : प्रवासी पुन्हा रस्त्यावरच ; प्राधिकरणचा वेळकाढूपणा

Unauthorized Stops for two days only | अनधिकृत थांबे दोन दिवसच

अनधिकृत थांबे दोन दिवसच

शरद ननावरे - खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट, बोगदा परिसर ते केसुर्डी फाटा या टप्प्यात होणाऱ्या वारंवार अपघातामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर रस्ता रुंदीकरण करण्यापूर्वी आवश्यक सुविधा पुरविण्याबात स्थानिकांनी अनेकदा मागणी केली. मात्र, एखादी घटना घडल्यानंतर हायवे प्राधिकरण तात्पुरते जागे होते व काही काळाने विसरूनही जाते.
गत आठवड्यात खंडाळा येथे झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्गावरील अनाधिकृत बस थांबे बंद करून सर्व प्रवासी बसेस खंडाळा बसस्थानकाकडे वळविण्यात आल्या होत्या. मात्र, हे चित्र फक्त दोनच दिवस पाहायला मिळाले. बसेसची सोय होत नसल्याने प्रवाशांना पुन्हा महामार्गावरच थांबावे लागत आहे.
महामार्ग प्राधिकरणाचा वेळकाढूपणा व एस. टी. महामंडळाचा हलगर्जीपणा यामुळे प्रवासी मात्र जीव मुठीत धरूनच थांबलेले आजही पाहायला मिळतात. त्यामुळे प्रशासनाचे डोळे उघडणार तरी केव्हा ? असाच प्रश्न स्थानिक जनतेतून विचारला जातोय. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणारी अशास्त्रीय वळणे, संरक्षक कठड्यांचा अभाव, क्वचितच दिसणारे सूचना फलक आणि अनेक सुविधांचा अभाव यामुळे या ठिकाणी महामार्ग ‘मृत्यूचा महामार्ग’ बनला आहे. त्यातच खंडाळा येथील उड्डाणपुलाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताने निष्पापांचे बळी गेले. त्यानंतर येथील बसथांबा बंद करून प्रवाशांना बसस्थानकात जाण्यास प्रवृत्त केले गेले. महामार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खंडाळा बसस्थानकात वळविण्यात आल्या; पण हा कामदेखलेपणा केवळ चार दिवसच पहायला मिळाला. त्यानंतर मात्र येरे माझ्या मागच्या अशीच परिस्थिती आहे. स्थानकाकडे बस न थांबल्याने प्रवाशांना पुन्हा महामार्गावरच उभे राहण्याशिवाय गत्यंतर नाही. फक्त पहिल्या थांब्याच्या जागेऐवजी शंभर फूट पढे थांबा केला गेलाय म्हणजे इथले मरणे तिथे एवढाच काय तो बदल म्हणायला हवे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्राधिकरणाचा हा खेळ थांबणार तरी कधी हा यक्ष प्रश्न आहे.
वास्तविक महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या आराखड्ड्यात गावानजीक कोणत्या सुविधा द्याव्यात, याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, यापैकी सेवा रस्ते, बसथांबे, स्ट्रीट लाईट, भुयारी मार्ग यांची कुठलीही सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. याबाबत हायवे अधिकाऱ्यांना जाब विचारला असता करतो म्हणण्यापलीकडे आजतागायत काही केले नाही. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.
खरं तरं या महामार्गावरून राज्यातील सर्वच भागातून तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, छत्तीसगड आदी राज्यातीलही वाहतूक होत असते. त्यामुळे महामार्गावरील असुविधांचा फटका सर्वांनाच बसतोय. केंद्र शासनाने याकडे लक्ष देऊन राज्याला सूचना कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त केली जातेय. मात्र सध्यातरी प्राधिकरण आणि ठेकेदारांच्या सावळ्या गोंधळामुळे आणि महामार्गावरील असुविधांमुळे लोकांचा नाहक जीव जात असतो. त्यामुळे या ठिकाणी निर्माण करावयाच्या सेवा-सुविधा या सर्वांसाठीच उपयोगी व संरक्षक ठरणार आहेत; परंतु हायवे रुंदीकरणासाठी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बदल करायचा म्हटलं की केंद्रशासनाची परवानगी नसल्याचे कारण प्राधिकरण अधिकारी पुढे करून टोलवाटोलवी करीत असतात. मात्र हायवेच्या सेवा रस्त्यांच्या सुविधा प्रथम निर्माण करा त्यानंतरच सहा पदरीकरणाचे काम सुरू करा, अशी भूमिका तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी घेतली आहे.


काय आहे महामार्गाच्या आराखड्यात
सेवारस्ते रुंदी ७ मीटर
गावापासून किमान ३ कि. मी. चे सेवा रस्ते
सेवारस्त्यांच्या बाजूने फूटपाथ
५ फूटाचे
सेवा रस्त्यांवर दिशादर्शक फलक व स्ट्रीटलाईट
ट्रक बे व बस बे- शौचालय, ाुतारी व पाण्याच्या सुविधेसह
खंडाळा उड्डाण पुलाची रुंदी व उंची वाढविणे
भुयारी मार्ग योग्य जागी व स्वच्छतेसह वापरास योग्य
महामार्गाची देखभाल



खंबाटकी बोगदा ते केसुर्डी फाटा या रस्त्यावरच्या सुविधांबाबत व करावयाच्या बदलाबाबत महामार्ग प्रशासनाला अनेकदा मागणीचे निवेदन दिले, बैठका झाल्या, मात्र, अद्यापही कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. वास्तविक सहापदरीकरणाच्या करारामध्येच काही त्रुटी आहेत त्यात बदल करणे आवश्यक आहे.
- अनिरुध्द गाढवे, सदस्य पंचायत समिती, खंडाळा

Web Title: Unauthorized Stops for two days only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.