पोटात असल्यापासून मोबाइलशी नाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST2021-09-04T04:47:08+5:302021-09-04T04:47:08+5:30
अगदी पाच-सहा महिन्यांची मुलेही मोबाइलवर अमुक एखादे गाणे लावले तर ठेका धरायला लागते. रडायचे थांबते. मुलाचे आई-बाबा, आजी-आजोबांना याचे ...

पोटात असल्यापासून मोबाइलशी नाळ
अगदी पाच-सहा महिन्यांची मुलेही मोबाइलवर अमुक एखादे गाणे लावले तर ठेका धरायला लागते. रडायचे थांबते. मुलाचे आई-बाबा, आजी-आजोबांना याचे अप्रूप वाटायला लागते. त्यामुळे मुले जसजसे मोठे होऊ लागते. ते रडायला लागले की, त्याच्याजवळ मोबाइल ठेवला जातो. त्यावर गाणे लावले, व्हिडिओ सुरू करून दिला की मूल थांबते; पण कळत, नकळत मुलांना कधी मोबाइलची सवय लागते ते त्याला अन् आई-बाबांनाही कळत नाही.
अनेक घरांमध्ये मोबाइलमुळे मुलांच्या जडणघडणीवर किती विपरीत परिणाम होत आहे, याचा अनुभव येत आहे.
विशेषत: नवरा, बायको आणि एक मूल असलेल्या कुटुंबातील मुलांना मोबाइलशिवाय चैनच पडत नसल्याचे समोर येत आहे. एकच अपत्य असल्याने अशा मुलांचा लाड केला जातो. हे करत असताना त्याला मोबाइलची कितपत गरज आहे, याचा विचार न करता केवळ खिशात पैसे आहेत म्हणून मुलांसाठी मोबाइल स्वतंत्र दिला जातो. त्यामुळे दिवसभर ते मूल मोबाइलवर केवळ कार्टून बघत बसलेले असते. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाइल त्याच्याच होतात असतो. कार्टून बघतच त्याचे खाणे-पिणे सुरू असते.
केवळ लहान मुलांनाच नावे ठेवून उपयोग नाही. मोठ्या माणसांचेही त्यापेक्षा वेगळे नसते. चार मित्र एकत्र आल्यानंतर काही वेळ गप्पा होतात; पण एक वेळ अशी येत की, सारेच जण आपापल्या मोबाइलमध्ये माना घालून बसलेले असतात. अगदी एखाद्या दिवशी वीज गेलेली असल्यामुळे चार्ज झालेला नसल्यास मोठी माणसेही बेचैन होतात. काय करावे हेही त्यांना कळत नाही.
चौकट :
दर दोन मिनिटांना मोबाइल सुरू
सोशल मीडियावर अनेक ग्रुप असतात. त्यामध्ये कोणी काही टाकलेले तर नाही ना? हे दर एक दोन मिनिटांनी पाहण्याची सवयच काहींना जडलेली असते. त्यामुळे आपण कोणासमोर आहोत, कोठे आहोत. समोरचा काय बोलतोय याकडे भान न राहता, अशी व्यक्ती मोबाइल सुरू करते. विनाकारण ग्रुप ओपन करून बघत राहते.
कोट :
मोबाइलचा उपवास धरावा
अनेक जण पोटाला आराम मिळावा म्हणून उपवास करतात. किमान आषाढी एकादशी, महाशिवरात्री तरी धरतोच. त्याचप्रमाणे प्रत्येकाने ठरवून वर्षातून काही दिवस मोबाइलचा उपवास करायला हरकत नाही. सहकुटुंबाने ज्या ठिकाणी मोबाइलला रेंज नसेल अशा ठिकाणी जाऊन राहिले, तर मन आणि मेंदूला आराम मिळू शकतो, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांकडून दिला जातो.
फोटो : ०३ मोबाईल हॅडॅक