उज्ज्वला, विद्याराणींचे भाग्य खुलले
By Admin | Updated: July 12, 2014 23:52 IST2014-07-12T23:50:58+5:302014-07-12T23:52:10+5:30
कऱ्हाड-महाबळेश्वर बिनविरोध : वाई अन् पाचगणीच्या लढतीकडे आता जिल्ह्याचे लक्ष

उज्ज्वला, विद्याराणींचे भाग्य खुलले
कऱ्हाड : पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी आघाडीच्या नगरसेविका अरूणा शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सत्ताधारी गटाच्या अॅड. विद्याराणी साळुंखे यांची निवड निश्चित झाली आहे. या निवडीची सोमवार, दि. १४ अधिकृत घोषणा होणार आहे.
सत्ताधारी गटाकडून नगराध्यक्षपदासाठी अॅड. विद्याराणी साळुंखे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. विरोधी यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडीकडून अरूणा शिंंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र, सत्ताधारी गटाकडे २१ सदस्य असल्याने अॅड. साळुंखे यांची निवड होणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या मुदतीत विरोधी आघाडीच्या अरूणा शिंंदे यांनी अर्ज मागे घेतला. अखेर दोन वेळा हुलकावणी देणाऱ्या नगराध्यक्षपदाची माळ अॅड. विद्याराणी साळुंखे यांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित झाले.
दरम्यान, सोमवारी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी मुख्याधिकारी प्रकाश रोडे यांच्याकडे अर्ज दाखल करावयाचे आहेत. त्यानंतर दुपारी दोनला प्रथम नगराध्यक्षपदाची अधिकृतरीत्या घोषणा होणार आहे. या निवडीनंतर उपाध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे. छाननीनंतर पंधरा मिनिटांचा वेळ अर्ज माघारीसाठी आहे. अर्ज माघारीची वेळ संपल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची घोषणा अथवा आवश्यकता असल्यास निवडणूक होणार आहे. (प्रतिनिधी)