उदयनराजेंच्या दबावतंत्राने राष्ट्रवादी घायाळ
By Admin | Updated: September 21, 2014 00:29 IST2014-09-21T00:25:55+5:302014-09-21T00:29:31+5:30
जिल्हा परिषद : उपाध्यक्षपदावर राहिले ठाम; आज होणार निर्णय

उदयनराजेंच्या दबावतंत्राने राष्ट्रवादी घायाळ
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचेच खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांनी टाकलेल्या दबावतंत्रामुळे राष्ट्रवादीच घायाळ झाली आणि नेत्यांना आपला निर्णय पुढे ढकलावा लागला. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कालावधी सव्वा वर्षांचा केला असलातरी पहिल्या टप्प्यात उपाध्यक्षपद माझ्या कार्यकर्त्यालाच हवे, असे सांगत उदयनराजेंनी राष्ट्रवादीपुढे मोठा पेच निर्माण केला. दरम्यान, याच बैठकीत पक्षशिस्त, पक्षाची चौकट या अनुषंगाने रामराजे यांनी भाष्य केले.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रविवार, दि. २१ रोजी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर नाव अंतिम करण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी भवनात खासदार, आमदारांची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री शशिकांत शिंदे, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. प्रभाकर घार्गे, आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. सदाशिवराव पोळ, जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.
राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्षांच्या दालनात झालेल्या या बैठकीला अन्य पदाधिकाऱ्यांना मज्जाव करण्यात आला होता. मंत्री शिंदे आणि रामराजेंनी सर्व आमदारांची मते जाणून घेतली. प्रत्येकांनी केलेली मागणी लक्षात घेता ती पूर्ण होणे अशक्य असल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांचा कालावधी सव्वा वर्षांचा राहिल, असे जाहीर केले. परिणामी यामुळे बारा लोकांना संधी मिळेल, असे सांगण्यात आले.
उदयनराजेंनी आक्रमक होत रवी साळुंखे यांना उपाध्यक्षपद देण्याची मागणी केली. भले सव्वा वर्षाचा प्रस्ताव मला मान्य असला तरी पहिल्यांदा संधी ही साळुंखेंनाच मिळाली पाहिजे, असे ठामपणे मंत्री शिंदे आणि रामराजे यांना सांगितले. ‘जर नाही झाले तर मग मी आहेच...’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उदयनराजे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उपस्थितांमध्येही अस्वस्थता पसरली.
यानंतर मंत्री शिदे आणि रामराजेंनी यानंतर अन्य आमदारांची भूमिका ऐकून घेतली. आ. मकरंद पाटील यांनी तर अध्यक्षपदी आनंदराव शेळके-पाटील आणि उपाध्यक्षपदी बाळासाहेब भिलारे यांना संधी देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी मतदारसंघनिहाय हा निकष न ठेवता तालुका निकष ठेवावा, अशीही मागणी केली.
माजी आमदार सदाशिवराव पोळ यांनी माणला अजूनही अध्यक्षपद मिळाले नसल्याचे सांगत यावेळी प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी केली. याचवेळी पोळ यांनी अध्यक्षपद यावेळी नाही मिळाले तर लोणार समाजाने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान न करण्याची शपथ घेतल्याची माहिती दिली. आ. विक्रमसिंह पाटणकर यांनीही आपल्या मागणीचा विचार करत संजय देसाई यांना पुन्हा सभापतिपद देण्याची विनंती मंत्री शिंदे आणि रामराजे यांच्याकडे केली. आ. प्रभाकर घार्गे आणि आ. बाळासाहेब पाटील यांनीही त्यांच्या उमेदवारांची नावे सुचविली. (प्रतिनिधी)