दोन महिन्यांपूर्वी तपासणी होऊनही दुर्घटना !
By Admin | Updated: January 9, 2017 00:09 IST2017-01-09T00:09:09+5:302017-01-09T00:09:09+5:30
कारभारावर प्रश्नचिन्ह : मान्सूनपूर्व अन् मान्सुनोत्तर तपासणी अहवालात दडलंय तरी काय ?

दोन महिन्यांपूर्वी तपासणी होऊनही दुर्घटना !
जगदीश कोष्टी ल्ल सातारा
तारळी धरणाच्या दरवाजाचे बॉनेट तुटल्याने अचानक एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. वास्तविक पाहता कोणत्याही धरणाची मान्सूनपूर्व व मान्सुनोत्तर असे दोनवेळा तपासणी करून अहवाल दिला जातो. मात्र, या अहवालात दडलंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तारळी धरणाच्या पाच दरवाजांपैकी मधल्या दरवाजाचे बॉनेट शनिवारी सकाळी अचानक तुटले. त्यामुळे एक हजार क्युसेक विसर्ग तारळी नदीपात्रात होत असल्याने पूरस्थिती उद्भवली होती. अचानक घडलेल्या बाका प्रसंगामुळे धरण व्यवस्थापनही गोंधळले. गळती रोखण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्नही केले.
अखेर तांत्रिक कारणे पुढे आल्याने साताऱ्यातून आलेल्या कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी चौदा तासांनी नवीन दरवाजा बसवून गळती रोखली. या घटनेने सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. पालच्या खंडोबाच्या यात्रेतील व्यापाऱ्यातील तारळी नदीकाठीच वाळवंटात दुकाने थाटली होती. ही घटना रात्री घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, या विभागाने वाहून गेलेला पूल एका दिवसात बनवून दिला हेही नक्कीच कौतुकास्पद आहे.
धरण उभारण्यापूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी धरणाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मंत्री खोत यांनी बांधकामाच्या कारभाराबाबत अहवाल मागविला आहे. परंतु ही घटना घडलीच कशी, या खोलातही जाणे गरजेचे आहे.
प्रत्येक धरणाची एप्रिल-मे मध्ये मान्सूनपूर्व आणि मान्सुनोत्तर तपासणी केली जाते. यामध्ये धरणाची उंची, धरण माती, काँक्रीट किंवा दगडातील असल्यास ते कोणत्या प्रकारचे आहे, त्यावरून परिस्थितीचा अहवाल दिला जातो. यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधित विभागाला कळविले जाते. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी सर्व त्रुटी दूर केल्या जातात. मान्सुनोत्तर तपासणी ही शक्यतो १५ आॅक्टोबरनंतर केली जाते. यामध्येही पुन्हा सर्व घटकांची तपासणी केली जाते.
अतिउत्साह येऊ शकतो अंगलट
तारळी धरणासारख्या घटना क्वचितच घडतात. या घटनेत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी कामे सुरू केली तरी वरिष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे असते. अतिउत्साहात काम करण्यास गेल्यावर होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही. काम करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ लागला तरी चालेल; परंतु अतिउत्साह दाखवता कामा नये, त्यासाठी वरिष्ठांचा सल्ला घेणे महत्त्वाचेच असते, असे मत या विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
धरणाच्या कामाचे यापूर्वी सर्वे झाला. त्यामध्येही धरणाचे काँक्रिट चांगले होते. तरीही बोल्ट उपसून निघाल्याने दुर्घटना कशी घडली हा प्रश्न सर्वांसाठीच अनुत्तरीत आहे.
असे उचलतात दरवाजे
दरवाजांमध्ये बिघाड असल्यास मनुष्यबळ किंवा विद्युतशक्तीचा वापर केला जातो. तारळी धरणावर विद्युत पुरवठाही कमी पडत असल्याने जनरेटरचा वापर केला जातो. अडचणींचा पिच्छा कायम
धरणातील त्रुटींचा पाठपुरावा करताना अनेक अडचणी येतात. यामध्ये पाण्याच्या आतमधील काम असेल तर तांत्रिक अडचणी येतात. अशावेळी परिस्थितीनुसार तात्पुरते किंवा कायमस्वरूपी कामे केली जातात.