वीस वर्षांची सेवा संपली
By Admin | Updated: September 14, 2014 23:38 IST2014-09-14T23:38:21+5:302014-09-14T23:38:21+5:30
वडापावचा गाडा उद््ध्वस्त : बोले कुटुंबीयांची नव्या गाड्यासाठी तयारी

वीस वर्षांची सेवा संपली
सातारा : बोलेमामांना वीस वर्षे इमाने-इतबारे सेवा दिल्यानंतर त्यांच्या बरोबरच त्यांच्या वडापावच्या गाड्याचेही जीवितकार्य संपुष्टात आले. तो भंगारात विकण्याखेरीज अन्य मार्ग नसल्यामुळे नवा गाडा तयार करवून घेण्याची तयारी बोले कुटुंबीयांनी सुहृदांच्या मदतीतून सुरू केली आहे.
विसर्जन मिरवणूक सुरू असताना सोमवारी रात्री भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चंद्रकांत बोले यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच त्यांना वीस वर्षे साथ देणारा त्यांचा गाडाही निकामी झाला आहे. बोले कुटुंबीयांना सर्वकाही शून्यापासून सुरू करावे लागणार आहे. त्यांच्या चारही मुलींनी यासाठी कंबर कसली असून, ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानुसार मदतीचा ओघही मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.
शुक्रवार आणि शनिवारी साताऱ्यातील अनेक संस्था आणि संघटनांनी पत्रके काढून सभासदांकडून मदत गोळा करायला सुरुवात केली. दरम्यान, ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या वडापावच्या गाड्यातील गॅसची शेगडी बोले कुटुंबीयांना मिळालीच नाही. आता सर्वकाही नव्यानेच सुरु करावे लागणार आहे. बोले यांचा दशक्रियाविधी येत्या शुक्रवारी असून, त्यानंतर गाडा तयार करवून घेणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कामगारही सरसावले
बोले कुटुंबीयांसाठी केवळ साताऱ्यातूनच नव्हे, तर बाहेरगावाहूनही काहीजणांनी मदत देण्यास सुरुवात केली आहे. ‘सिटू’च्या कार्यक्रमासाठी सातारला आलेल्या कऱ्हाड मोटर्स अँड प्रोजेक्ट्स कंपनीतील हणमंत काटकर, नवनाथ सुर्वे आणि जगदाळे या कामगारांनी ‘सिटू’च्या पदाधिकाऱ्यांकडे उत्स्फूर्तपणे मदत दिली. तसेच याकामी अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थीही गुंतले आहेत.